चंद्रकांत देवणे, वसमत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर वसमत विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणित किचकट झाले आहे. युतीने तालुक्यातून आघाडी कायम ठेवली असली तरी आता शिवसेनेचा उमेदवार कोण? हा नवाच प्रश्न उपस्थित होत झाला आहे.वसमत विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकीत राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेगावकर यांनी शिवसेनेचे डॉ. जयप्रकाश मुंदडा यांचा पराभव केला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या घडामोडी व जय-पराजय झाला, त्याचे परिणाम विधानसभा निवडणुकीत होणार हे निश्चित आहे. राष्ट्रवादीकडून आ. जयप्रकाश दांडेगावकर यांची उमेदवारी निश्चितच आहे. त्या दृष्टिने त्यांची तयारी व व्यूहरचनाही तयार आहे. पक्षांतर्गत त्यांना कोणी विरोधक नाही. स्पर्धकच नसल्याने त्यांचा मार्ग प्रशस्त आहे. पूर्णा व बाराशिव कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांची बाजू भक्कम आहे. तरीही लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवाराने प्रचंड आघाडी घेतली. ग्रामीण भागात एकही सर्कल आघाडीला तारू शकले नव्हते. केवळ शहरातच मताधिक्य मिळाले होते आणि हीच बाजू आ. दांडेगावकरांसाठी डोकेदुखीची ठरू शकते. दुसरीकडे शिवसेनेचे माजीमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा पुन्हा एकदा शिवसेनेच्या तिकिटावर उभे राहून नशिब आजमावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ. मुंदडा यांचा वैयक्तिक संपर्क, कार्यकर्त्यांची फौज व शिवसेनेची असलेली वोटबँक या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. लोकसभा निवडणुकीत युतीला आघाडी मिळाल्याने वसमतमध्ये युतीची मते शाबूत असल्याचेही स्पष्ट झाल्याने डॉ. मुंदडा पुन्हा जोर-बैठका काढत आहेत. परंतु शिवसेनेचा एक गट त्यांच्या विरोधात आहे. सुभाष वानखेडे यांनी डॉ. मुंदडा यांना पर्याय म्हणून लोकसभेत कामाला लावण्यासाठी अनेकांना विधानसभेचे गाजर दाखवले होते. त्यामुळे शिवसेनेत अनेकजण बाशिंग बांधून तयार आहेत. या बाशिंंगवाल्यांना वानखेडेंचा पाठिंबाही राहणार आहे आणि हिच डॉ. मुंदडा यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. शिवसेनेची उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेसचे माजी नेते सोपानराव नादरे, जि.प.चे गटनेते अनिल कदम, अॅड. संतोष भालेराव मित्रमंडळाचे अध्यक्ष अॅड. संदीप भालेराव हे प्रयत्न करीत आहेत. शिवसेनेतील वाढलेल्या इच्छुकांमुळे यावेळी शिवसेनेची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार, यावरून तर्क-वितर्क लढवले जात असल्याने संभ्रमाचेच वातावरण आहे. सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. शिवाजीराव जाधव हेही निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. वसमत तालुक्यात अन्य पक्षाची म्हणावी तेवढी शक्ती नाही. तरीही तिसऱ्या तगड्या उमेदवाराची ऐनवेळी इंट्री होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. प्रमुख पक्षांचे उमेदवार कोण राहतात व त्यांची प्रचार पद्धती व ‘खर्च करण्याची ताकद’ यावरच विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे वानखेडे यांना ९,०९१ एवढे मताधिक्य
शिवसेनेच्या उमेदवारीवरून संभ्रमाचे वातावरण
By admin | Updated: June 11, 2014 00:24 IST