पळशी : पळशी ते जोगेश्वरी हायस्कूलपर्यंतच्या एक किलोमीटर रस्त्याचे काम महिन्याभरापूर्वी करण्यात आले. परंतु, दोन दिवसांपूर्वी झालेल्या तुरळक पावसातच या रस्त्याच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. रस्त्याची दबाई, बाजूच्या चरा न खोदणे, डांबराचा वापर कमी करणे आदी कामे बोगस झाल्याचे समोर आले आहे. ठेकेदाराने संबंधित अधिकाऱ्यांच्या मदतीने बोगस काम केल्याचा आरोप पळशी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
पळशी ते जोगेश्वरी हायस्कूलपर्यंतच्या रस्त्यावरून दुचाकी तर सोडा पायी चालणेदेखील कठीण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी गावातील भाऊसाहेब बडक यांनी स्वखर्चाने ४० ट्रॉली मुरूम स्वखर्चाने टाकला. त्यानंतर ग्रामपंचायतीने बांधकाम विभागाकडे रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी केली. तर एका महिन्यापूर्वी डांबरीकरणाचे काम करण्यात आल्याने पळशी, अंधारी, उपळी, मांडगाव, लोणावडी येथील नागरिकांना सिल्लोडला जाण्यासाठी दिलासा मिळाला. परंतु या रस्त्याचे पहिल्याच पावसाने पितळ उघडे पडले आहे. या रस्त्याची ठेकेदाराने त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी सरपंच अरविंद बडक, उपसरपंच काकासाहेब बडक, चेअरमन दत्तू बडकसह गावकऱ्यांनी केली आहे. जर असे झाले नाही तर गावकरी उपोषण करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
130721\img-20210713-wa0152_1.jpg
पावसाच्या आगमनाने रस्त्याची लागली वाट