औरंगाबाद : जिल्ह्यात निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे. इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये मातंग समाज व तत्सम १२ पोटजातींच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना सरासरी ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनी १२ ऑगस्टपर्यंत सर्व कागदपत्रांसह साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, सामाजिक न्याय भवन, जिल्हा कार्यालयात सादर करावेत, असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक किसन पवार यांनी केले आहे.
महा-डीबीटी पोर्टलवर नोंदणी करा
औरंगाबाद : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात नगदी पिके अंतर्गत रबी हंगामामध्ये कडधान्य, भरडधान्य, तृणधान्य या पिकांचे अनुदानित दराने बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषी अवजारे व सिंचन साधने या बाबींचे अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करावेत. पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांमधून लॉटरी पद्धतीने लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे, असे कृषि विभागाने कळविले आहे.
पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करा
औरंगाबाद : जिल्ह्यातील बँकांनी पीक कर्जाचे ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे. पीक कर्जासाठी जुने-नवे कर्ज करण्याची प्रक्रिया पार पाडावी, असे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी पीक कर्ज, मुख्यमंत्री रोजगार हमी कार्यक्रम, बचत गटांसाठी खाते उघडणे, राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आदींसह विविध विषयांचा बँकनिहाय आढावा एका बैठकीत घेतला.
पंधरा दिवसांत तक्रारींचा निपटारा करा
औरंगाबाद : रास्त धान्य वितरण आणि ग्राहकहितासंबंधीच्या तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करावा, असे आदेश अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, जिल्हा दक्षता समिती आणि भाववाढ सनियंत्रण समितीची बैठक गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.