करमाड : मान्सून पूर्व व रोहिणी नक्षत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागतची कामेदेखील करता आली नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी मशागतीचे काम पूर्ण केले होते त्यांनी पेरणी करून घेतली. ज्यांना पेरणीचा मुहूर्त अगोदर साधता आला नाही ते पावसाची वाट बघून बघून आता विहिरीच्या पाण्यावर पेरणी करण्याचा निर्णय घेत आहेत.
औरंगाबाद तालुक्यात मान्सून पूर्व व रोहिणी नक्षत्रात जोरदार पावसाने हजेरी लावली. यावर्षी चांगला पाऊस होईल, अशी भविष्यवाणी हवामान खात्याने वर्तविल्यामुळे यावर्षी देखील खरिपाची पेरणी वेळेवरच होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. मशागतीची कामे पूर्ण झाली होती, त्या शेतकऱ्यांनी कपाशी, मका, तूर, सोयाबीन, मूग, उडीद या खरीप पिकांची लागवड करण्यास सुरुवात केली. मात्र ज्या शेतकऱ्यांची मशागतीचे कामे पूर्ण झालेली नव्हती अशा शेतकऱ्यांची मशागतीचे कामे सततच्या पावसाने मुळे जवळपास १५ दिवस लांबली होती. १० जूननंतर पाऊस उघडल्यानंतर या शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली व पेरणी करण्यासाठी पावसाची वाट बघू लागले. मात्र जवळपास १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवल्या. आता पावसाची किती दिवस वाट बघायची पुढे चांगला पाऊस झाला तरी खरिपाची लागवड वेळेवर झाली नाही, तर उत्पादनात घट होईल म्हणून ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी आहे किंवा ठिबक, तुषार सिंचनासारखे इतर स्त्रोत उपलब्ध आहेत. अशा शेतकऱ्यांनी कोरड्यात कपाशी, मका, तूर अशी पीक लागवड करण्यास सुरुवात केली. ज्यांच्याकडे पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नाही असे कोरडवाहू शेतकरी मात्र आभाळाकडे डोळे लावून बसले आहे.
जूनच्या सुरुवातीला पेरण्या केल्या, त्या शेतकऱ्यांना आता पिकांना पाणी देण्याची गरज पडत आहे. त्यातील सर्वच शेतकऱ्यांकडे पाणी देण्याचे स्त्रोत किंवा पाणीच उपलब्ध नाही असे कोरडवाहू शेतकरी पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अशा शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढावणार अशी भीती निर्माण झालेली आहे.
फोटो - औरंगाबाद तालुक्यातील गाढेजळगाव येथील शेतकरी अशा पद्धतीने कपाशीला पाणी भरून मका पिकाला स्प्रिंकलरद्वारे पाणी देत आहे.