रवि गात, अंबड अंबड पंचायत समिती परिसर सध्या राजकीय आखाडा बनला आहे. एकाच आठवडयात पालकमंत्री राजेश टोपे व आ. संतोष सांबरे यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र पाणीटंचाई आढावा बैठका पार पडल्याने पंचायत समितीतील विविध विभागातील बहुतांश अधिकारी, कर्मचारी चांगलेच सुखावले आहेत. पदाधिकार्यांच्या गोंधळाचा फायदा घेत या अधिकारी, कर्मचार्यांनी सर्वसामान्य जनतेची कामे करणेच बंद केल्याचा आरोप नागरिकांमधुन होत आहे. या सर्व प्रकारामुळे पंचायत समिती राजकीय आखाडा बनल्याची चर्चा शहरात रंगत आहे. १४ मे रोजी पालकमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली अंबड पंचायत समिती सभागृहात पाणी टंचाई आढावा बैठक झाली. यावेळी पालकमंत्री टोपे यांनी ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेत कामचुकार अधिकार्यांना चांगलेच फैलावर घेतले. टोपे यांनी गटविकास अधिकारी पी.जी.बनसोड यांचाही चांगलाच समाचार घेतला. पाणीटंचाई असणार्या गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ तत्काळ कामे सुरु करण्याचे आदेश दिले. या पाणीटंचाई आढावा बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापतींचे पती रमेश पैठणे, उपसभापती रामदास कुरणकर, राष्ट्रवादीचे जि.प.सदस्य, प.स.सदस्य व पक्षाचे इतर पदाधिकारी हजर होते तर विरोधी शिवसेना-भाजपाचे सर्व सदस्य गैरहजर होते,हे विशेष. यानंतर २० मे रोजी पंचायत समितीच्या याच सभागृहात बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष सांबरे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सर्व विभागातील अधिकार्यांच्या उपस्थिती पुन्हा एकदा पाणीटंचाई आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आ.सांबरे यांनी ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेत अधिकार्यांची कानउघाडणी केली, पुन्हा एकदा अधिकार्यांना तत्काळ कामे सुरु करण्याचे आदेश दिले. बैठकीस शिवसेनेचे जि.प.सदस्य, प.स.सदस्य यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी हजर होते तर पंचायत समिती सभापती, उपसभापती व राष्ट्रवादीचे इतर पं.स.सदस्य गैरहजर होते हे विशेष. विशेष म्हणजे एका आठवड्यात दोन पाणीटंचाई आढावा बैठका होऊन व दोन्ही लोकप्रतिनिधींना अधिकार्यांची कानउघाडणी करुनही अद्यापही तालुक्यातील पाणी टंचाईची अवस्था जैसे थे आहे. तालुक्यातील अनेक गावांमधील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे वास्तव अद्यापही बदलेले नाही. अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची नागरिकांची मागणी असतानाही ही मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. याप्रमाणेच अनेक गावातील बोअर दुरुस्तीचे कामे ठप्प आहेत. मग या दोन्ही पाणी टंचाई आढावा बैठकीतुन काय साध्य झाले असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. वास्तविक पालकमंत्री राजेश टोपे व आ.संतोष सांबरे यांच्यात चांगला समन्वय असल्याचे वेळोवेळी पाहावयास मिळाले आहे. या दोघांची संयुक्त पाणी टंचाई आढावा बैठक पार पडली असती आणि दोघांनी सामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेत अधिकार्यांची कानउघाडणी केली असती तर चित्र वेगळे दिसले असते. पालकमंत्री टोपे व आ.सांबरे यांना व्यवस्थित माहिती देत पंचायत समिती सभापती, उपसभापती व त्या-त्या पक्षाच्या पदाधिकार्यांनी ही संयुक्त पाणी टंचाई आढावा बैठक घडवून आणणे गरजेचे होते. मात्र सभापती, उपसभापती व इतर पदाधिकार्यांना ग्रामीण भागातील पाणी टंचाईपेक्षा आपले राजकारण जास्त महत्वाचे वाटले. पाणी टंचाई सारख्या गंभीर प्रश्नावर ढिम्म झालेल्या पंचायत समिती प्रशासनास कार्यरत करण्यासाठी आता तरी सत्ताधारी व विरोधी पदाधिकार्यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. दोन वेगवेगळ्या बैठका पार पडूनही तालुक्यातील पाणीटंचाई अद्यापही कायम आहे. (वार्ताहर)
अंबड पंचायत समिती बनली राजकीय आखाडा
By admin | Updated: May 24, 2014 01:38 IST