वाळूज महानगर : गत आठवड्यात वाळूज येथे अतिक्रमणाच्या वादातून पेटवून घेतलेल्या एका ५० वर्षीय इसमाचा गुरुवारी उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात यावी, यासाठी त्यांचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणला. या प्रकरणी पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढून ७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्यामुळे तणाव निवळला.उत्तम भंडारी (५० रा. लायननगर, वाळूज) हे घराशेजारी शौचालयाचे बांधकाम करीत होते. त्यांच्या घराशेजारील सुभाष सोनवणे, कुसुम सोनवणे, किशोर नाडे, आशाबाई चव्हाण, रेखा रोडे, उज्ज्वला डोंगरजाळ व कल्पना म्हस्के यांनी उत्तम भंडारी यांच्याशी वाद घालत बांधकाम थांबविण्यासाठी दबाव आणला होता. यावेळी भंडारी यांनी शेजाऱ्यांना अगोदर सोनवणे या इसमाने अतिक्रमण करून घर बांधले असून त्याचे अतिक्रमण काढा, नंतर माझे अतिक्रमण काढतो असे सांगितले होते. यानंतर उत्तम भंडारी यांनी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास राहत्या घरी पेटवून घेतले. पत्नी ताराबाई व सून नंदिनी यांनी उत्तम यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले.उत्तम ४० टक्के भाजले होते. शासकीय रुग्णालयात त्यांनी शेजाऱ्यांबरोबर झालेल्या वादातून आपण पेटवून घेतल्याचा जबाब दिला होता.उपचारादरम्यान मृत्यूउपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. यामुळे गावात तणावाचे वातावरण पसरले. या घटनेस जबाबदार असणाऱ्या आरोपींविरुध्द कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा शवविच्छेदन होऊ देणार नाही, असा पवित्रा भंडारी यांच्या नातेवाईकांनी घेतला होता.
आत्महत्येनंतर प्रेत ठाण्यात
By admin | Updated: June 24, 2016 01:27 IST