जालना : जायकवाडी ते जालना जलवाहिनी इंदेवाडीजवळ शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. बारा तासांच्या प्रयत्नानंतर व २० मजुरांच्या मदतीने जलवाहिनी दुरूस्त करण्यात आली. पाणी सोडल्यानंतरच जलवाहिनी दुरूस्ती झाली की नाही हे कळणार आहे.एका खाजगी दूरध्वनी कंपनीचे केबल अंथरण्याचे काम सुरू असताना पोकलॅनचा धक्का लागून जलवाहिनीचा पाईप निखळून गेल्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेले. शनिवारी दुपारनंतर व रात्री २० मजुरांनी काम करून जलवाहिनी फुटलेल्या भागाची दुरूस्ती केली. जलवाहिनी सभोतालचा भाग खोदून काही ठिकाणी वेल्डींग करण्यात आली. यासाठी पालिका तसेच खाजगी दूरध्वनी केबल टाकणाऱ्या कंत्राटदाराने मदत केली. नुकसान झालेल्या भाग पूर्णपणे दुरूस्त करण्यात आला असला तरी चाचणीनंतरच प्रत्यक्ष स्थिती स्पष्ट होईल. ही जलवाहिनी दुरूस्ती झाली तरी जायकवाडी ते जालना ९० किलोमीटरच्या अंतरात १७७ व्हॉल्व्ह आहेत. बहुतांश व्हॉल्व्ह फोडण्यात आले आहेत.काही ठिकाणी गळती लागलेली आहे. या व्हॉल्व्हच्या दुरूस्तीसाठी बुधवारपर्यंत पाणीपुरवठा बंदच राहणार आहे. त्या ठिकाणी वेल्डींग अथवा किरकोळ दुरूस्ती तात्काळ करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा सभापती राहुल हिवराळे यांनी सांगितले. शहरवासियांना बुधवारपर्यंत पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा करावी लागेल, असे हिवराळे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
बारा तासानंतर जलवाहिनी दुरुस्त...!
By admin | Updated: April 25, 2016 00:11 IST