ईट : वैयक्तिक शौचालय बांधून त्याचा वापर न करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली होती. सदरील कारवाईने अल्पमतात आलेल्या भूम तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींवर प्राशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत सर्वसामान्यांसोबतच गावपुढाऱ्यांनाही वैयक्तिक शौचालय बांधून त्याचा नियमित वापर करण्याची सक्ती करण्यात आली होती. याबाबत प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात आली. परंतु, अनेक गावपुढाऱ्यांनी त्याकडे रितसरपद्धतीने कानाडोळा केला. त्यावर जिल्हा परिषदेकडून संबंधित सदस्यांना अनेकवेळा नोटिसा बजावून कारवाईची तंबी देण्यात आली. त्यानंतर अनेकांनी शौचालयाचे बांधकाम केले. तर काहीजणांनी नोटिसा गांभीर्याने घेतल्या नाहीत. त्यावर जिल्हा परिषदेकडून अशा लोटाबहाद्दर सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. मात्र, येथेही सुनावणीचा खेळ सुरू झाला. यामध्ये जवळपास एक ते दीड वर्षाचा कालावधी लोटला होता. त्यानंतर मागील काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उघड्यावर बसणाऱ्या सदस्यांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला. अनेक ग्रामपंचायतींचे पन्नास टक्यांपेक्षा जास्त सदस्य अपात्र ठरल्यामुळे अशा ग्रामपंचायती अल्पमतात आल्या आहेत. यामध्ये भूम तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निपाणी ग्रामपंचायतीचे सात पैकी सहा, माळेवाडी पाच पैकी तीन, मात्रेवाडी सात पैकी पाच, देवग्रा सात पैकी सहा, वाकवड नऊ पैकी सहा, वडाचीवाडी पाच पैकी तीन, वंजारवाडी नऊ पैकी सात तर हिवर्डा ग्रामपंचायतीचे पाच पैकी चार सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे उपरोक्त ग्रामपंचायती अल्पमतात आल्याने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी टी. बी. उगलमुगले यांनी प्रशासकांची नियुक्ती केली आहे. अपात्र झालेल्या सदस्यांचा केवळ सात ते आठ महिन्यांचा कालावधी शिल्लक होता.(वार्ताहर)
नऊ ग्रामपंचायतींवर प्रशासक ‘राज’
By admin | Updated: January 13, 2015 00:12 IST