बीड : येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांची औरंगाबाद येथे शनिवारी बदली झाली. पावणेदोन वर्षापूर्वी बीडमध्ये आलेल्या खेडकर यांनी तब्बल ६१ लाचखोरांना गजाआड केले. त्यांनी धडक कारवाया करीत जिल्ह्यावर छाप सोडली.ते १० जून २०१४ रोजी बीड येथे आले होते. पदभार घेतल्यनंतर त्यांनी प्रारंभी जिल्ह्याचा आढावा घेतला. एसीबी कार्यालयात तक्रार दाखल झाल्यानंतर त्याची योग्यरित्या नियोजन करून कारवाई केली. कोणतीही तक्रार प्रलंबित राहणार नाही, याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली होती. तक्रार दिल्यानंतर तक्रारदार परत आला नाही तर त्याचा पाठपुरावा करीत त्यांनी लाचखोरांवर कारवाई केली. पावणेदोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी बीड जिल्ह्यात ५९ कारवाया केल्या तर इतर दोन ठिकाणी कारवाया केल्या. अशा एकूण ६१ कारवाया त्यांनी केल्या आहेत. शनिवारी त्यांची प्रशासकीय स्तरावरून औरंगाबाद येथे एसीबी कार्यालयात बदली करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या कालावधीत त्यांनी केलेल्या कारवाया उल्लेखनीय आहेत. पोलीस, तलाठी यांना तर त्यांनी अद्दल तर घडवलीच शिवाय भूमापन अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी या पदावरील बड्या माशांनाही त्यांनी धडा शिकवला. त्यामुळे त्यांची कारकीर्द गाजली. (प्रतिनिधी)
पावणेदोन वर्षात ६१ लाचखोरांना बेड्या
By admin | Updated: February 9, 2015 00:46 IST