औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाणारी शिक्षकासाठीची पात्रता सिद्ध करणारी ‘टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट’ (टीईटी) रविवारी शहरातील एकूण ४२ केंद्रांवर घेण्यात आली. १८ हजार ६३९ उमेदवारांनी ही परीक्षा दिली; परंतु उर्दू माध्यमाच्या छापील प्रश्नपत्रिका न देता हस्तलिखिताच्या स्वरूपात देण्यात आल्या. त्यात तब्बल ५४ चुका असल्याचे लक्षात आल्याने गोंधळ उडाला. परीक्षा परिषदेने उर्दू भाषा माध्यमांच्या प्रश्नपत्रिका डीटीपी करून छापील स्वरूपात तयार केल्या नव्हत्या, तर हस्तलिखिताच्या झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. त्यात चुकाच चुका असल्याने परीक्षार्थी गोंधळून गेले. या सर्व प्रकाराचा उर्दू शिक्षक संघटनेने निषेध नोंदविला. संघटनेचे प्रदेश सरचिटणीस शेख मोईनोद्दीन नजिरोद्दीन यांनी सांगितले की, राज्य परीक्षा परिषदेची उर्दू भाषेविषयीची अनास्थाच यातून स्पष्ट झाली आहे. डीटीपी स्वरूपातील छापील प्रश्नपत्रिका देण्याचे नियोजनही परीक्षा परिषद करू शकली नाही, त्यामुळे परिषदेने यापुढे उर्दू माध्यमाची परीक्षाच घेऊ नये, याविषयीची तक्रार आपण आयुक्त व मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. प्रभारी जिल्हा शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांनी सांगितले की, शहरातील ४२ केंद्रांवर रविवारी (दि.१४) टीईटी घेण्यात आली. ही परीक्षा शांततेत पार पडली असून त्यात सकाळच्या सत्रात ३३ केंद्रांवर पहिला पेपर झाला. त्यासाठी १२ हजार १८४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते; परंतु प्रत्यक्षात ११ हजार ५२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
उर्दूच्या प्रश्नपत्रिकेत ५४ चुका!
By admin | Updated: December 15, 2014 00:51 IST