बीड : जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात सोमवारी पार पडलेल्या स्थायी समिती बैठकीत फक्त आणि फक्त दुष्काळावरच चर्चा झाली. जि. प. ने दुष्काळी पार्श्वभूमीवर तब्बल ५४ कोटी रूपयांचा आराखडा तयार केला असून मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे.स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित होते. उपाध्यक्षा आशा दौंड, सभापती कमल मुंडे, महेंद्र गर्जे, बजरंग सोनवणे उपस्थित होते.बैठकीच्या सुरूवातीलाच शामराव राठोड यांनी दुष्काळी उपाययोजनांचा मुद्दा उपस्थित केला. ऊसतोड मजुरांच्या पाल्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. सहा लाख मजूर स्थलांतर करतात, त्यांच्यासाठी स्थानिक पातळीवर कामे उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी सूचविले.अध्यक्ष पंडित यांनी ५३ कोटी ९१ लाख ८६ हजार रूपये खर्चाचा आराखडा तयार असल्याचे सांगितले. नवीन विंधन विहिरी, अधिग्रहण, विशेष दुरूस्ती, बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा, विहिरी खोलीकरण आदी कामे करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
दुष्काळी उपायांसाठी ५४ कोटींचा आराखडा
By admin | Updated: December 16, 2014 01:06 IST