उस्मानाबाद : ‘न्यायालयाच्या आदेशानंतरही ३३ शिक्षकांना न्याय मिळेना’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी न्यायालयाच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याबाबात शिक्षण विभागाला आदेशित केले होते. त्यानुसार शिक्षणाधिकारी सचिन जगताप त्रुटींची पूर्तता करीत बुधवारी संबंधित शिक्षकांना नियुक्ती आदेश दिले. त्यामुळे शिक्षकांतून समाधान व्यक्त होत आहे.जिल्हा परिषदअंतर्गत कार्यरत १०४ शिक्षकांचे आॅगस्ट २०१५ मध्ये समायोजन करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांनीच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये नव्याने समायोजन करण्यात आले होते. दरम्यान, ‘नव्याने करण्यात आलेले समायोजन अन्यायकारक असल्याचे सांगत आम्हाला पूर्वीच्याच शाळा देण्यात याव्यात’, अशी मागणी केली ३३ शिक्षकांनी केली होती. परंतु, तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संबंधित ३३ शिक्षकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोटावला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. सदरील याचिकेवर सुनावणी झाली असता, २०१४-१५ च्या संचमान्यतेनुसार नियुक्ती देवू, असे ‘अफिड्युट’ जि.प. प्रशासनाकडून सादर करण्यात आले होते. तसेच जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते महेंद्र धुरगुडे यांनीही सभागृहामध्ये याबाबत आवाज उठविला होता. परंतु, काही त्रुटींमुळे यांना नियुक्ती आदेश मिळण्यास विलंब होता होता. त्यामुळे शिक्षकांतून नाराजी व्यक्त होत होती. दरम्यान, शिक्षकांची व्यथा ‘लोकमत’ने मांडल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी या प्रकरणी लक्ष घालून शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जगताप यांनी संबंधित शिक्षकांना नियुक्ती आदेश देण्याच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या त्रुटी दूर केल्या. त्यानंतर बुधवारी संबंधित ३३ शिक्षकांना नियुक्ती आदेश दिले आहेत. शिक्षण विभागाने केलेल्या या कार्यवाहीमुळे मागील एक -दीड वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला असून शिक्षकांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)
३३ शिक्षकांना अखेर नियुक्ती !
By admin | Updated: April 21, 2016 00:58 IST