कळमनुरी : तालुक्यात ३० आॅगस्टपासून पावसाची संततधार सुरू असून ३१ आॅगस्ट रोजीही पाऊस सुरू होता. या पावसामुळे कयाधू नदीची पातळी वाढली आहे. या नदीकाठच्या २१ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार कृष्णकांत चिकुर्ते यांनी दिली. कळमनुरी तालुक्यात सर्वत्र संततधार पाऊस पडत आहे. या हंगामात प्रथमच एवढा मोठा पाऊस पडत आहे. यामुळे जलपातळी वाढली आहे. छोटे नदी-नाले तुडुंब वाहत आहेत. ३० आॅगस्ट रोजी ७७.१७ मि.मी. पाऊस झाला. आतापर्यंत ३०४.९९ मि.मी. पाऊस पडला आहे. या पावसाने कयाधू नदीला बऱ्यापैकी पाणी आले आहे. संततधार पाऊस उद्यापर्यंत सुरूच राहिला तर कयाधू नदीकाठच्या नागरिकांना अन्य ठिकाणी हलवावे लागणार आहे. ३१ आॅगस्ट रोजी तहसीलदार चिकुर्ते यांनी नदीकाठच्या गावांना भेटी देऊन पाहणी केली व सतर्कतेचा इशाराही दिला आहे. तहसीलदारांनी बिबथर, नांदापूर, हरवाडी, रूपूर, सावंगी भू., सोडेगाव, चाफनाथ, सालेगाव, डोंगरगाव नाका, गंगापूर, कोंढूर, डिग्रस, शेवाळा, देवजना, येगाव, सापळी, येलकी, डोंगरगावपूल, चिखली, फुटाणा, कान्हेगाव या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. कयाधू नदीला पूर आला ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी असलेले समाजमंदिर, शाळा अशा ठिकाणी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. कयाधू नदीच्या पाणी पातळीवर तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवकांना नजर ठेवून ग्रामस्थांना सहकार्य करण्यास सांगण्यात आले आहे. ग्रामस्थांनी काही अडचणी आल्यास प्रशासनास कळविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. प्रशासन कयाधू नदीच्या पाणी पातळीवर नजर ठेवून असल्याचेही तहसीलदार कृष्णकांत चिकुर्ते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. े(वार्ताहर)
२१ गावांना सतर्कतेचा इशारा
By admin | Updated: September 1, 2014 00:28 IST