जालना : जिल्ह्यात गेल्या फेब्रुवारी व मार्च २०१४ मध्ये झालेल्या बेमोसमी पाऊस आणि गारपिटीमुळे ज्या शेतकर्यांच्या शेत पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाले त्यांना राज्य शासनातर्फे जाहीर झालेल्या विशेष पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यासाठी यापूर्वी ९५ कोटी आणि दि. १३ मे २०१४ रोजी ८६ कोटी अशी एकूण १८१ कोटी रुपयांची मदत उपलब्ध झाली आहे. या मदतीचे वाटप शेतकर्यांच्या बॅँक खात्यावर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी येथे आज दिली. शेती व फळ पिकाच्या झालेल्या नुकसानीसाठी आपद्ग्रस्त शेतकर्यांना कोरडवाहू शेतीस प्रचलित दरानुसार ४ हजार ५०० रुपये प्रती हेक्टर या व्यतिरिक्त अधिकची विशेष रक्कम ५ हजार ५०० रुपये हेक्टर अशी एकूण १० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. ओलिताखाली शेतीस ९ हजार प्रति हेक्टर या व्यतिरिक्त विशेष रक्कम ६ हजार रुपये प्रती हेक्टर अशी एकूण १५ हजार रुपये आणि फळ पिकांसाठी १२ हजार रुपये प्रति हेक्टर या व्यतिरिक्त अधिकची विशेष रक्कम १३ हजार रुपये प्रति हेक्टर अशी एकूण २५ हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. बाधित शेतकर्यांच्या बॅँक बचत खात्यात थेट जमा करण्यात यावी, ज्या बाधित शेतकर्यांचे बॅँकेत बचत खाते नसेल त्यांचे झिरो बॅलन्स खाते उघडून त्यांच्या खात्यामध्ये मदत रक्कम जमा करण्यात यावी, कोणत्याही बाधित शेतकर्यांस रोखीने किंवा निविष्ठा स्वरुपात मदत करण्यात येऊ नये तसेच मदतीची रक्कम बाधित शेतकर्यांच्या बॅँक खात्यावर थेट जमा करतांना मदतीच्या रक्कमेतून कोणत्याही बॅँकेने कोणत्याही प्रकारची वसूली करु नये, अशा सूचना जिल्हाधिकारी नायक यांनी सर्व तहसीलदार यांना दिल्या आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय प्राप्त मदतीची रक्कम आणि बाधित शेतकर्यांना वितरित करण्यात आलेल्या रकमांची जिल्हाधिकार्यांनी माहिती घेतली.
गारपीटग्रस्तांसाठी १८१ कोटींची मदत
By admin | Updated: May 24, 2014 01:40 IST