जळकोट : तालुक्यातील जवळपास १ हजार हेक्टर्स क्षेत्र सिंचनाखाली आणण्याची क्षमता असलेल्या डोंगरकोनाळीच्या साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे आले असतानाही केवळ कंदरभरणी अभावी पाणी साठविणे थांबले आहे़ जळकोट तालुक्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या डोंगरकोनाळीच्या मोठ्या साठवण तलावाला २००९-१० साली मंजुरी मिळाली आहे़ त्याअनुषंगाने या तलावाचे काम मागील जून महिन्यापर्यंत सुरु होते़ मात्र आता हे काम थांबविण्यात आले आहे़ या तलावाचे बुडीत क्षेत्र ६२ हेक्टर्स इतके असून, ७५५ हेक्टर्स क्षेत्र प्रत्यक्ष ओलिताखाली येणार आहे़ शिवाय, पाण्याच्या मुरण्यामुळे २०० ते २५० हेक्टर्स क्षेत्राला फायदा होणार आहे़ तलावानजिकच्या कोळनूर, सोनवळा, डोंगरकोनाळी या गावांसोबतच जळकोट, पाटोदा, लाळीलाही या तलावाचा फायदा आहे़ सध्या जळकोट तालुक्यात २५ हजार हेक्टर्स क्षेत्र लागवडीयोग्य आहे़ त्यापैकी २ हजार हेक्टर्स क्षेत्र ऊसाखाली आहे़ डोंगरकोनाळीच्या एकट्या साठवण तलावामुळे ऊसाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी सेईल़ इतकेच नव्हे तर परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे़ मात्र, केवळ कंदरभरणीचे काम थांबले असल्यामुळे आजघडीला तलावात पाण्याची साठवणूक करणे शक्य राहिले नाही़ त्यामुळे लवकरात लवकर हे काम करावे, अशी मागणी माजी सरपंच व्यंकटराव कवठाळे, चेअरमन संगमेश्वर टाले, चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे़
१७ कोटींच्या तलावाची कंदरभरणी होईना !
By admin | Updated: August 18, 2014 01:00 IST