भूम : तालुक्यात गत आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बाणगंगा, वाकवड, नांदगाव हे प्रकल्प पूर्णत: भरले असून, तालुक्यात सुरू असलेल्या १८ पैकी १६ टँकर बंद करण्यात आले असून, बावी येथे अद्यापही दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे़भूम तालुका व परिसरात दमदार हजेरी लावल्याने तालुक्यातील खरिपाच्या पिकांना संजीवनी मिळाले आहे़ तर साठवण प्रकल्पातील पाणीपातळीत वाढ होत आहे़ तालुक्यातील नांदगाव साठवण तलाव शनिवारी १०० टक्के भरला असून, सांडव्यातून पाणी वाहत आहे़ यापूर्वी बाणंगा व वाकवड हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत़ तर भूम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आरसोली मध्यम प्रकल्पात ८५ टक्के पाणीसाठा झाला असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास दोन दिवसात हा प्रकल्प भरण्याची शक्यता आहे़ रामगंगा साठवण तलावात ८५ टक्के, संगमेश्वर प्रकल्पात ५० टक्के, हातोला प्रकल्पात ८० टक्के तर दहिफळ प्रकल्पात ४५ टक्के पाणीसाठा आहे़ तर पाथ्रूड परिसरातील जेजला, अंबी, पाथरूड हे लघू प्रकल्प अद्यापही जोत्याखाली आहेत़ दरम्यान, सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकांमध्ये पाणी साचले असून, ती पिके पिवळी पडण्याचा धोका उद्भवला आहे़ आंबी, वालवड सर्कल वगळता भूम, माणकेश्वर, ईट मंडळांतर्गत चांगला पाऊस झाला असून, नदी, ओढे तुडूंब भरून वाहत आहेत़ (वार्ताहर)
भूम तालुक्यातील १६ टँकर झाले बंद
By admin | Updated: September 1, 2014 01:07 IST