उस्मानाबाद : जिल्ह्यातील अंगणवाड्या या सर्वांसाठी पथदर्शक ठराव्यात, तेथे करण्यात येणारे लहान मुलांचे संगोपन उत्कृष्टरित्या व्हावे, यासाठी जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुरूवातीला जिल्ह्यातील १४० अंगणवाड्यांची निवड करण्यात आली असून, त्यांना ‘आयएसओ’ मानांकन मिळावे, यासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे.गावकऱ्यांनीही आपल्या गावातील अंगणवाडी ही अधिकाधिक उत्कृष्ट असावी यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची गरज आहे. त्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी प्रत्येक अंगणवाडीस भेट देवून लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न करणार आहेत. जिल्ह्यात अंगणवाडी कार्यकर्ती आणि पर्यवेक्षिका यांच्यामार्फत लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येवून शून्य ते तीन, तीन ते सहा वर्ष वयोगट, गरोदर व स्तनदा मातांची संख्या, वजन घेतलेल्या बालकांची संख्या, साधारण, मध्यम आणि तीव्र कमी वजन श्रेणीतील बालकांची संख्या आदींचे सर्वेक्षण केले जाते. त्यानुसार तीव्र व मध्यम कमी वजनाच्या बालकांच्या पोषण आहाराकडे लक्ष देवून त्यांना साधारण श्रेणीत आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. याशिवाय जिल्ह्यात २८ बाल विकास केंद्रेही स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक अंगणवाड्यांत माता बाल संरक्षण कार्ड तयार करण्यात आले असून, प्रत्येक बालकाची नियमित आरोग्य तपासणी, त्याचे नियमित लसीकरण याकडेही लक्ष दिले जाते. ही नियमितता कायम रहावी यासाठी आता प्रयत्न करण्यात येत आहेत. अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील यांनी सर्व बालविकास अधिकाऱ्यांची यासंदर्भात बैठक घेऊन आयएसओ प्रमाणपत्र मिळण्यासाठी सर्व कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. के. नवले यांनी प्रत्येक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी प्रत्येक अंगणवाडीस भेट देवून गावकऱ्यांचे सहकार्य घेऊन आणि त्यांना याचे महत्त्व पटवून सहकार्य करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. (प्रतिनिधी)जिल्ह्यात १६६३ अंगणवाड्याजिल्ह्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत एकूण १ हजार ६६३ अंगणवाड्या तर १९९ मिनी अंगणवाड्या आजअखेर कार्यरत आहेत. जिल्ह्यातील ६०५ गावातील व वस्त्यांवरील अंगणवाड्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. तालुकानिहाय अंगणवाड्या व मिनी अंगणवाड्यांची संख्या अशी : भूम तालुक्यात १५४ (२२), कळंब २१९ (२९), उस्मानाबाद १८० (१७), तुळजापूर २११ (२९), उमरगा १७६ (१०), परंडा १४६ (३२), लोहारा १४२ (१४), वाशी ११७ (१६), मुरूम १४७ (१६) आणि तेर १७१ (१४) (कंसातील आकडे मिनी अंगणवाड्यांचे आहेत.)९७ हजार बालकांना लाभया अंगणवाडयांमधून गरोदर माता, स्तनदा माता आणि शून्य ते सहा वयोगटातील बालकांसाठी पूरक पोषण आहार सुविधा देण्यात येते. याशिवाय किशोरवयीन मुलींसाठीही ही योजना राबविली जाते. जिल्ह्यात सध्या शून्य ते सहा वयोगटातील ९७ हजार ९८९ बालकांना या योजनेचा लाभ होत आहे. याशिवाय १८ हजार ९२४ गरोदर व स्तनदा माता आणि ४ हजार ४८८ किशोरवयीन मुलींनीही याचा लाभ घेतला आहे.
१४० अंगणवाड्या ‘आयएसओ’च्या स्पर्धेत
By admin | Updated: June 15, 2014 00:58 IST