रोकडा सावरगाव : रोकडा सावरगावसह या परिसरातील १२ हजार २१२ हेक्टरवरील तूर पिकाचा धुराळाच झाला असून, यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या लागवडीचा खर्च निघेल की नाही? याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे़ अहमदपूर तालुका हा आवर्षणग्रस्त व डोंगराळ तालुका म्हणून ओळखला जातो़ यावर्षी तर या तालुक्यावर पावसाने अवकृपा दाखविल्यामुळे १३ हजार २१२ हेक्टरवरील तुरीचे पीक धोक्यात आले असून, ते जाग्यावरच वाळत आहे़ सध्या तूर या पिकाला पाण्याची आवश्यकता आहे़ परंतु, पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना पिकास पाणी देणे अवघड झाले आहे़यावर्षी या भागातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे़ पेरण्या तब्बल दीड ते दोन महिने उशिरा झाल्या़ तसेच पेरणीयोग्य पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांना कसेबसे जेमतेम पावसावर पेरण्या कराव्या लागल्या़ पाण्याअभावी सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग यासारखी कमी कालावधीची पिके गेली़ सोयाबीनच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे़ तुरीच्या पिकाचा कालावधी पाच ते सहा महिन्यांचा असतो़ यावर्षी पाऊसच नसल्यामुळे तुरीला फुल व शेंगा लागण्यापूर्वीच ते ऊन धरून जाग्यावर वाळत असल्यामुळे रोकडा सावरगाव परिसरासह या परिसरातील १३ हजार २१२ हेक्टरवरील तूर वाळत असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे तालुक्यातील व परिसरातील शेतकरी अडचणीत सापडला असून, शेतकऱ्यांनी या हंगामामध्ये केलेला खर्च निघत नसल्याची चर्चा शेतकरी वर्गातून होत आहे़ (वार्ताहर)
१२ हजार हेक्टरवरील तुरीचा धुराळा
By admin | Updated: October 30, 2014 00:27 IST