औरंगाबाद : शहरात विविध क्षेत्रांत भिशीचा व्यवहार चालत आहे. मात्र, काही भिशीचालकांनी हात वर केल्याने शहरवासीयांची सुमारे १०० कोटींची रक्कम त्यामध्ये अडकली आहे. मागील चार ते पाच महिन्यांपासून भिशीतील पैसे मिळत नसल्याने ३०० पेक्षा अधिक भिशीधारक चिंताग्रस्त आहेत. भिशी खेळणाऱ्यांमध्ये काही व्यापारी, उद्योजक, डॉक्टर, वकील, शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. भिशीत कोणताच कागदोपत्री व्यवहार होत नसल्याने भिशीचालकाविरोधात पोलिसांत तक्रारही देता येत नाही. त्यांच्यासाठी भिशीचालकाकडून पैसे वसूल करणे अवघड जागेचे दुखणे होऊन बसले आहे. पूर्वी बँकेतून व्यापाऱ्यांना कर्ज मिळत नसे त्यावेळी भिशीच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या रकमेतून व्यापारी आपल्या व्यवसायाचा विस्तार करीत असत. मात्र, काळ बदलला तरीही भिशी खेळणाऱ्यांची संख्या कमी न होता वाढतच आहे. भिशीत मुख्यत: दोन प्रकार आहेत. त्यात कमिशन भिशी (पुकार भिशी) व बिनव्याजी भिशी या प्रकारांचा समावेश होतो. कमिशन भिशी अत्यंत जोखीमपूर्ण आहे. मात्र, लाभही तेवढाच मिळतो. यामुळे ही भिशी जास्त प्रिय ठरली आहे. २० हजारांपासून ते १ कोटीपर्यंतच्या वेगवेगळ्या भिशा शहरात चालविल्या जातात. यात मोठ्या भिशीमध्ये धनाढ्यांचा पैसा असतो. प्रत्येक गटात २० ते २५ जणांचा समावेश असतो. भिशीमध्ये सर्व व्यवहार विश्वासावरच चालत असतात; परंतु काही अपप्रवृत्तींमुळे भिशी चालविणाऱ्या मध्यस्थावर कंगाल होण्याची वेळ आली आहे, तर काही मध्यस्थांनी भिशीतील पैसा प्रॉपर्टीमध्ये गुंतविल्याने व तिथे मंदी असल्याने पैसा अडकला आहे. परिणामी, मागील चार ते पाच महिन्यांपासून भिशीचे पैसे मिळणे कठीण झाले आहे. लाखो रुपये अडकल्याने भिशीधारकांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. नाव न लिहिण्याचा अटीवर एका व्यापाऱ्याने सांगितले की, त्याचे पाच लाख रुपये भिशीत अडकले आहेत. भिशीचालक एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने भिशीधारक हादरले आहेत. कारण, शहरात सुमारे ३०० पेक्षा अधिक लोकांचा पैसा भिशीत अडकला असून त्याची रक्कम सुमारे १०० कोटींच्या घरात आहे.एका कापड व्यापाऱ्याने सांगितले की, कोणत्याही कागदपत्राविना लोक भिशीत लाखो रुपये गुंतवीत आहेत. व्यवसायाच्या विस्तारासाठी किंवा ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसा पडून आहे, असे लोक भिशीत पैसा गुंतवितात. लहान भिशीपेक्षा मोठ्या रकमेच्या भिशीत फसवणूक होऊ लागली आहे. मोंढ्यातील एका व्यापाऱ्याने सांगितले की, एका भिशीचालकाने चार महिन्यांपूर्वी अचानक भिशी खेळणे बंद केले. आमची लाखो रुपयांची रक्कम देण्यास आता तो टाळाटाळ करीत आहे. पुरावा नाही आणि कायद्याने अवैध व्यवसाय असल्याने भिशीचालकाविरोधात पोलिसांत तक्रार नोंदविता येत नाही. अशा परिस्थितीत भिशीधारक अडकले आहेत. भांडी बाजारातील एका व्यापाऱ्याने सांगितले की, ज्याची २५ लाख रुपयांपर्यंत रक्कम लावण्याची आर्थिक क्षमता आहे, अशांनी ५० लाख रुपयांपर्यंतची भिशी खेळण्यास सुरुवात केली व भिशी उचलून पोबारा केला. यामुळे भिशीधारक अडचणीत आले.
भिशीत अडकले १०० कोटी
By admin | Updated: December 25, 2014 00:48 IST