वाढवणा (बु.) : वाढवणा व परिसरात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात बोकाळली असून, यास राज्य परिवहन महामंडळ जबाबदार आहे. या महामंडळाच्या आगार प्रमुखांनी उदगीर-जळकोट मार्गे वाढवणा (बु.) दररोज ७ फेर्यापैकी ५ फेर्या बंद केल्यामुळे प्रवाशांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. वाढवणा (बु.) ता. उदगीर व परिसरात सध्या लग्नसराईमुळे प्रत्येकांना लग्नासाठी प्रवास करणे हे बंधनकारकच आहे. या भागातील सोनवळा, मंगरुळ, डोंगर कोनाळी, मंगरुळ, लाळी (बु.), येवरी, लाळी (खु.), बेळसांगवी, वाढवणा या भागातील ग्रामस्थांना कोठेही जाण्याचे झाल्यास उदगीर-जळकोट किंवा जळकोट-उदगीर या बसचाच आधार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या उदगीर आगारामधून उदगीर ते जळकोट मार्गे वाढवणा जाणार्या बसेसचे सुनियोजन २० वर्षांपूर्वी केलेले असून, त्या नियोजनामुळे या मार्गावरून सकाळी ६ ते रात्री ७ पर्यंत दररोज ७ फेर्या बसेसच्या होतात. त्यामुळे या भागातील जनतेची नाळ या बसेसशी आपोआपच जोडलेली आहे. विद्यार्थी, रुग्ण, प्रवासी, बाजारपेठेत जाणारे ग्रामस्थ याद्वारेच ये-जा करतात. गेल्या १ ते २ महिन्यांपासून उदगीर आगाराने ७ फेर्यापैकी ५ फेर्या बंद केल्यामुळे प्रवाशांची ऐन लग्नसराईमध्ये त्रेधातिरपट उडाली आहे. याचमुळे प्रवासी आपोआपच अवैध प्रवासी वाहतूक असणार्या वाहनांकडे वळतोच. ते वाहन चालक प्रवाशांना चक्क मेंढरे कोंबल्यासारखे कोंबून भरधाव वेगाने धावतात. त्यात अपघाताच्याही प्रमाणात वाढ झाली आहे. प्रवासी संख्या भरपूर असताना बसच्या फेर्या अचानक बंद का करण्यात आले, याचे कारण प्रवाशांना समजू शकले नाही. परंतु, तालुक्यातील अनेक गावांतील रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरील बसच्या फेर्या बंद केल्या आहेत. परिणामी, उदगीर आगारात सध्या टायरअभावी १० बस आगारातच असल्याने प्रवासी नागरिकांची गैरसोय होत आहे. (वार्ताहर) याविषयी चर्चा करण्यासाठी आगारप्रमुख एस.आर. बाशा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, तालुक्यातील अनेक मार्गावर प्रवासी मिळत नसल्यामुळे या मार्गावरील बसेस बंद करण्यात आले आहेत. जूनमध्ये शाळा सुरू होताच पुन्हा बसेस सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
टायरअभावी १० बसेस आगारातच !
By admin | Updated: June 2, 2014 00:50 IST