औरंगाबाद : बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्याकडील मका ८०० ते १,००० रुपये प्रतिक्विंटल दराने अडत बाजारात विकल्यानंतर आता शासनाने जिल्ह्यात १० भरड धान्य खरेदी केंद्रे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मक्याचा हमी भाव १,३१० रुपये असल्याने ज्यांच्याकडे मका शिल्लक आहे अशा मका उत्पादकांना फायदा होणार आहे. मात्र, सातबारा दाखवून व्यापारीच हमीभावाचा फायदा उचलतील, याची शक्यताही वर्तविली जात आहे. राज्यामध्ये धान्य खरेदीसाठी केंद्र शासनाची नोडल एजन्सी म्हणून भारतीय अन्न महामंडळ काम पाहणार आहे. तसेच बिगर आदिवासी क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष खरेदी मार्केटिंग फेडरेशनद्वारा करण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मुख्यत: भरड धान्य केंद्रात मकाच खरेदी केला जातो. प्रशासनाने जिल्ह्यातील ९ तालुक्यांत १० भरड धान्य खरेदी केंद्रे सुरू करावेत, असे आदेश आले आहेत. नुकताच जिल्हा प्रशासनाने मागील वर्षीचा १ लाख ५९ हजार क्विंटल मका लिलावाद्वारे विक्री केला. ज्यात शासनाला सुमारे ४ कोटींचा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. अजूनही ठिकठिकाणच्या गोदामातील मका खरेदीदाराने उचलला नाही. यामुळे नवीन केंद्र कुठे सुरू करावे, असा यक्ष प्रश्न मार्केटिंग फेडरेशनला पडला आहे. जाधववाडी कृउबाच्या सेल हॉलमधील मका अजून उचलला नसल्याने नवीन मका ठेवण्यासाठी रेल्वेस्टेशन रोडवरील गोदामात नवीन मका उतरावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मका खरेदी केल्यानंतर त्याची रक्कम ई-पेमेंटद्वरा शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करावी, संबंधित शेतकऱ्याचे बँक खाते नसेल तर रकमेच्या रेखांकित धनादेशाद्वारा पैसे देण्यात यावेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात १० भरड धान्य खरेदी केंद्रांना मंजुरी
By admin | Updated: January 4, 2015 01:14 IST