मुख्याधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद : बाबा अझिम यांचा पत्रकार परिषदेत आरोपमूल : शहरात दररोज जमा होणाऱ्या कचऱ्यांची योग्य विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने नगर पालिकेने मूल शहराच्या बाहेर घनकचरा प्रकल्प उभारलेला आहे. या प्रकल्पामध्ये खत निर्मितीचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. परंतु मागील ८ महिण्यापासून सदर प्रकल्पामध्ये कोणतेही काम न करता एका बेरोजगार अभियंता सेवा सहकारी संस्थेला २४ लाखाचे बिल मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहे. सदर बिल अदा करण्यामागे मुख्याधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याची माहिती मूल नगर पालिकेचे नगरसेवक बाबा अझिम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.येथील विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अझिम पुढे म्हणाले की, घनकचरा प्रक्रिया केंद्रामध्ये खत निर्मिती करण्याच्या दृष्टीने निविदा मागविण्यात आल्या होत्या. यामध्ये चंद्रपूर येथील श्री साई अभियंता बेरोजगार सेवा सहकारी संस्थेची २ लाख २६ हजार रुपये मासिक दराची निविदा तीन वर्षासाठी मंजूर करून अटी व शर्तीला अधीन राहून करारनामा करण्यात आला. परंतु नगरपालिकेने कंत्राटदार संस्थेच्या करारनाम्यानुसार काम न करताही जून २०१४ ते नोव्हें. २०१४ पर्यंत १३ लाख ५६ हजार रुपयाचे बिल तेरावा वित्त आयोगांतर्गत कंत्राटदाराला अदा करण्यात आले आहे.डिसेंबर २०१४ चे बिल कंत्राटदार संस्थेला अदा करताना करारनाम्यानुसार घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २००० अन्वये शून्य प्रणाली सायन्टीफीक हॅन्डफील तयार करणे, प्लास्टिकची विल्हेवाट शास्त्रशुद्ध पद्धतीने लावण्यात येत नाही, सेग्रीगेशन मशीनचा वापर अपेक्षेप्रमाणे करण्यात आलेले नाही, प्रकल्पामध्ये तयार झालेले खत विक्री करण्याची जबाबदारी कंत्राटदार संस्थेची असतानाही विक्री केलेली नाही. तसेच विक्रीसंबंधी कार्यवाही करण्यात आलेली नाही. असे असतानाही डिसेंबर २०१४ पर्यंतचे बिल नगर पालिकेने कंत्राटदार संस्थेला अदा करण्याचे कारण काय, असा सवाल नगरसेवक अझिम यांनी केला आहे.कंत्राटदार संस्थेने घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २००० ची अंमलबजावणी केलेली नाही, तसेच करारनाम्यानुसार कामेही केलेली नसल्याचे खुद्द पालिकेचे आरोग्य निरीक्षक अभय येपूरवार यांनी दिलेल्या अहवालात म्हटलेले आहे. परंतु अहवालालाच बदल देत कंत्राटदाराचे बिल अदा करण्यात आलेले आहे. घनकचरा प्रकल्पामध्ये योग्य पद्धतीने काम होत नसल्यामुळे कामात सुधारणा करण्याबाबत कंत्राटदार संस्थेला ३ पत्र देण्यात आले. मात्र कामात अजूनही सुधारणा करण्यात आलेली नाही.एप्रिल २०१५ पासून दर महिण्याला नगरपालिकेने १२ टन ओला कचरा घनकचरा प्रक्रिया केंद्रामध्ये पोहोचता केला. त्यानुसार आॅगस्ट २०१५ पर्यंत ६० टन खत तयार करून त्याची विक्री करणे अपेक्षित होते. परंतु सदर संस्थेने केलेले नाही. त्यामुळे नगरपालिकेचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचेही नगरसेवक अझिम यांनी सांगितले. तसेच मागील आठ महिन्यापासून घनकचरा प्रकल्पामध्ये कोणत्याही प्रकारचे काम सुरू नसतानाही कंत्राटदाराला १४ लाख ४६ हजाराचे बिल अदा करण्यात आलेले आहे. सदर बिल कंत्राटदाराला देण्यामागचे कारण नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी नगरसेवक बाबा अझिम, महेश हरडे यांनी यावेळी केली. (तालुका प्रतिनिधी)
काम बंद; मात्र लाखोंचे बिल अदा
By admin | Updated: May 9, 2016 00:57 IST