मेघा भाले : विसापुरात महिलाशक्तीचा जागर बल्लारपूर : आजघडीला महिला सर्वच क्षेत्रात सरशी घेत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणातही पुरुषांच्या बरोबरीने वाटचाल सुरू आहे. त्यांच्या इच्छाशक्तीला प्रयत्नांचे बळ प्राप्त होत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील वावर यशस्वी आलेख उंचावणारा आहे. आता मागे वळून पाहण्याचे दिवस संपले असून आगेकुच करीत महिलांनी आत्मनिर्भरतेसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे आवाहन अॅड. मेघा भाले यांनी केले. बुधवारी विसापूर येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला शक्तीचा जागर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विसापूर ग्रामपंचायतीच्या वतीने पंढरीनाथ देवस्थान, मंगल कार्यालयात महिला दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पाककला, कपलरेस, निंबु चमचा, संगीत खुर्ची आदी स्पर्धा पार पडल्या. अध्यक्षस्थानी विसापूरच्या सरपंच रिता जिलटे होत्या. याप्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. मेघा भाले, सुरेखा कुलटे, शशीकला खिरटकर, राधाबाई नांदे, मंजुळा कन्नाके, अफसाना शेख, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, शशीकला जीवने, सुरेखा इटनकर, निता वनकर, सुरेखा कोडापे, सरिता झाडे, उज्वला कोडापे, मीना जुमनाके यांची उपस्थिती होती.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याला मार्लापन करून मानवंदना देण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन व आभार शारदा डाहुले यांनी केले. यावेळी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी गावातील महिलांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
महिलांनी आत्मनिर्भरतेसाठी प्रयत्न करावे
By admin | Updated: March 10, 2016 01:20 IST