घाटकुळात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाने आदर्श ग्रामचा पुरस्कार तसेच जिल्हा स्मार्टचे प्रथम क्रमांक प्राप्त झालेले आहे. तालुक्यात घाटकुळचा विकास इतरांना प्रेरणादायी आहे. परंतु येथे राबविल्या जात असलेल्या जलजीवन मिशन योजना आवश्यक उपाययोजना करीत नसल्याने येथे पाणीटंचाई उद्भवलेली आहे. ऐन उन्हाळ्यात रखरखत्या उन्हात महिलांना पाण्यासाठी पायपीट करण्याची नामुष्की ओढवली आहे.
घाटकुळात ७५ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारलेली असून जवळपास १६० घरगुती नळधारकांना सुरळीतपणे पाणीपुरवठा केला जात होता. परंतु आता जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरी नळ कनेक्शन दिल्याने जवळपास १४० नळांची वाढ झालेली आहे.
नळधारकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने कंत्राटदाराने नियोजन केलेले नसल्याने अर्ध्याअधिक नळांना पाणीपुरवठा होत नसल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
सदर गावात खनिज निधीअंतर्गत जवळपास ४० लाख रुपये निधी मागील वर्षी पाईपलाईन दुरुस्तीकरिता प्राप्त झाल्याचे कळते. तरीपण सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. गावात उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे महिला एकवटून ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर धडक देऊन नळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत निवेदन दिलेले आहे.