वरोरा : दहा हजार शेतकऱ्यांनी यावर्षी हमीभावाने कापूस विकण्याकरिता नोंदणी केली. आजपर्यंत ३१६६ शेतकऱ्यांनी कापूस विकला. शिल्लक सात हजार शेतकऱ्यांशी बाजार समितीच्या वतीने वारंवार संपर्क साधला. तरीही कापूस विक्रीकरिता शेतकरी प्रतिसाद देत नसल्याचे दिसून आले.
कृषी उत्पन्न बाजार समिती, वरोराकडे यावर्षी हमीभावाने कापूस विक्रीकरिता दहा हजार ३०९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यातील तीन हजार १६२ शेतकऱ्यांनी हमीभावाने ७५ हजार २०१ क्विंटल कापूस विकला, तर काही शेतकऱ्यांनी थेट जिनिंगमध्ये दोन लाख १२ हजार क्विंटल विकला. सात हजार १४७ शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही हमीभावाने कापूस विकला नसल्याचे दिसून येत आहे. बाजार समितीच्या वतीने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांशी वारंवार संपर्क केला जात आहे. परंतु शेतकरी प्रतिसाद देत नसल्याचे प्रथमच आढळून आले आहे.
बॉक्स
कापूस बाजारपेठेवर निवडणुकीचे सावट
नुकतीच ग्रामपंचायतीची निवडणूक आटोपली. निवडणूक सुरू असताना ग्रामीण भागातील नागरिकांनी शेतातील कामे बाजूला ठेवून ग्रामपंचायत निवडणुकीत व्यस्तता दाखवली. त्याचा परिणामही असा झाला की, कापूस वेचता आला नाही. कापूस तसाच शेतात आहे. आता निवडणुका झाल्याने शेतकरी कापूस विकायला आणतील, असे मानले जात आहे.
बॉक्स
कापसावर बोंड अळीचे आक्रमण
कापसाची दोन ते तीन वेळा वेचणी झाल्यानंतर बोंड अळीने आक्रमण केल्याने अनेक शेतकऱ्यांनी कपाशीच्या उभ्या पिकात नांगर फिरवला. कपाशीला बोंडे आहेत. परंतु ते फुटत नाहीत. त्यामुळे कपाशीच्या उत्पन्नात घट झाल्याचे मानले जात आहे.