देवाडा : राजुरा तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भागातील देवाडा व परिसरात बहुतांश ग्रामपंचायती आदिवासी पेसामध्ये येतात. आदिवासी बांधवांसाठी खावटी वाटप योजना शासनाकडून राबविण्यात येत आहे. या योजनेचा अनुदानाचा पहिला हप्ता दोन हजार रुपये थेट आदिवासी बांधवांच्या बचत खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. कोरोना संकटात दिलासा मिळावा, यासाठी आदिवासी विकास विभागाकडून आदिवासींसाठी खावटी अनुदान योजना जाहीर करण्यात आली. यामध्ये जीवनावश्यक वस्तू देण्यात येणार असल्याचा उल्लेख या शासन निर्णयात होता. मात्र दहा महिने लोटूनही याबाबतची निविदाच शासनाने काढली नसल्याचा रोष आदिवासी जनतेकडून व्यक्त केला जात आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आदिवासी बांधवांच्या हाताला काम नाही. मागील वर्षांपासून कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक भयभीत असल्याने गाव सोडून दुसऱ्या गावाला कामासाठी जाण्यासाठी घाबरत आहेत. देवाडा परिसरात कोणतेही लहान मोठे उद्योग वा कंपन्या नसल्यामुळे त्यांना शेतीच्या मजुरीच्या भरवशावरच आपले पोट भरावे लागते, मजुरी दररोज मिळत नसल्याने कधी उपाशीपोटी राहावे लागते. किराणा व जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात याव्या, याकडे आदिवासी विकास विभाग व शासन, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे.