वडाळा (तु) : गावामध्ये पाणलोट विकास पथकाचे तांत्रिक सहकार्याने पाणलोट प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी शासनाच्या निर्देशाप्रमाणे मासिक मानधनावर ग्रामसभेने समिती सचिवाची निवड करून प्रकल्पाचे काम सुरू केले. मात्र गेल्या ११ महिन्यांपासून भद्रावती व वरोरा तालुक्यातील पाणलोट सचिव मानधन व प्रवास भत्याच्या रकमेपासून वंचित आहेत. यासंदर्भात भद्रावती तालुक्यातील सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.भद्रावती तालुक्यातील वडाळा (तु), विलोडा, कोकेवाडा (मा), काटवल (भ), काटवल (तु), आष्टा, टेकाडी (दि) व कोकेवाडा (मु) या आठ गावांत २०११ पासून पाच वर्षांसाठी भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम (आयडब्ल्यूएमपी) मान्यता मिळवून प्रकल्प सुरू केला. गावामध्ये पाणलोट विकास पथकाचे तांत्रिक सहकार्याने पाणलोट प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी लोकसहभाग हा केंद्रबिंदू मानून शासनाच्या निर्देशाप्रमाणे ग्रामसभेने पाणलोट समिती स्थापन करून मासिक मानधन तत्वावर समितीच्या सचिवाची निवड करून प्रकल्प राबविण्याला सुरूवात केली. प्रकल्प मंजुरीपासून पाणलोट सचिवांना शासनाचे निर्देशाप्रमाणे ३००० रुपये मासिक मानधन म्हणून मार्च २०१५ पर्यंत नियमित देण्यात आले. मात्र एप्रिल २०१५ पासून सचिवांना आजपर्यंतचे मानधन व प्रवास भत्याची रक्कम अजुनपर्यंत देण्यात आली नाही. सदर रक्कम तातडीने देण्याची मागणी केली जात आहे. (वार्ताहर)
पाणलोट सचिव मानधनापासून वंचित
By admin | Updated: March 5, 2016 00:58 IST