पाण्याची चोरी : कारवाईची मागणीसावली: येथील तुकूम परिसराजवळील आसोला मेंढा नहराला लागून असलेली पाईप लाईन फुटल्याने सावली शहरातील पाणी पुरवठा बंद आहे.पावसाळ्याच्या दिवसातही नागरिकांना पाणी मिळत नसल्याने अशुद्ध विहिरीच्या पाण्यावर सावलीकरांना तहान भागवावी लागत आहे. परिणामी नागरिकांना जलजन्य आजाराची लागण होण्याची शक्यता बळावली आहे. याकडे नगरपंचायत प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.१७ जूनला ग्रामपंचायतीचे अधिकार गोठवून सावलीला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाला. या नगरपंचायतीचा कारभार सध्या तहसीलदार वंदना सौरंगपते काम पाहत आहेत. तालुक्यात ग्रामंपचायतीच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. त्यामुळे तहसीलदार निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. या संधीचा फायदा घेवून काही शेतकरी जलवाहिनी फोडून शेतीला सिंचन करीत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. येथे ग्रामपंचायत अस्तित्वात असताना असाच प्रकार काही शेतकऱ्यांनी केला होता. मात्र त्यांच्यावर सरपंचाकडून कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे पाण्याची चोरी शेतकरी निर्भिडपणे करीत आहेत.प्रशासन कामात मग्न आहेत. ही संधी साधून शेतकऱ्यांनी पाईपलाईन फोडून पाणी चोरण्याचा मार्ग निवडला आहे. पाईपलाईन फुटल्याने पाण्याच्या टाकीपर्यंत पाणी पोहोचत नाही. गावात पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. येथे नेहमीच नळाला कमी पाणी पुरवठा होतो. अशुद्ध पाण्याचा वापर जनता करीत आहे. त्यामुळे पावसाच्या दिवसात नागरिकांच्या आरोग्याला धोका संभवू होऊ शकतो.सार्वजनिक विहिरीजवळ घराशेजारील लोकांनी अतिक्रमण केले आहे. सांडपाणी याच विहिरीजवळून वाहत असल्याने विहीरीतील पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. पाईप लाईन फोडणाऱ्या शेतकऱ्यावर कारवाई करावी व दुरुस्तीकरिता आलेल्या खर्चाची भरपाई त्या शेतकऱ्यांकडून घ्यावी अशी मागणी केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
पाईप लाईन फुटल्याने पाणीपुरवठा बंद
By admin | Updated: July 24, 2015 01:00 IST