चंद्रपूर शहर महानगर पालिका निवडणूक : प्रतीक्षा संपली; आचारसंहिता लागू चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगर पालिकेची मुदत एप्रिल-२०१७ मध्ये संपत आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहिता कधी लागणार, याबाबत चंद्रपूरकरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता होती. अखेर प्रतीक्षा संपली असून १९ एप्रिलला मतदान तर २१ ला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता बुधवारपासून चंद्रपूर शहरात लागू झाली असून राज्याच्या निवडणूक आयुक्तांनी राज्यातील चंद्रपूर, लातूर, परभणी या तिन्ही महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. पूर्वी नगरपालिका असलेल्या चंद्रपूर शहराला महानगराचा दर्जा मिळल्यानंतर २०११ मध्ये चंद्रपूर महानगर पालिकेची स्थापना झाली. त्यासाठी पहिली निवडणूक एप्रिल-२०११ मध्ये झाली होती. आता ही मुदत संपत असल्याने दुसरी निवडणूक जाहीर झाली आहे. महापौरपद अडीच वर्षासाठी असल्याने पहिल्या महापौर काँग्रेसच्या संगीता अमृतकर झाल्या. त्यानंतर महापौरपदाच्या झालेल्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये फुट पडली. काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचा गट भाजपाला जाऊन मिळाला. त्यांच्या पाठिंब्यावर आणि भाजपाची मदत घेवून काँग्रेसच्या राखी कंचर्लावार या महापौर झाल्या. त्या काँग्रेसच्या तिकीटावर विजयी झाल्या असल्या तरी महापौर पदाच्या निवडणूक काळात भाजपात प्रवेश घेतला. त्यामुळे आपोआपच ही महानगर पालिका भाजपाच्या ताब्यात गेली. त्यासाठी काँग्रेसमधील १२ नगरसेवकांनी केलेली बंडखोरी महत्वाची घटना ठरली. या १२ नगरसेवकांमध्ये माजी महापौर संगीता अमृतकर, विद्यमान महापौर राखी कंचर्लावार, स्थायी समितीचे माजी सभापती रामू तिवारी, स्थायी समितीचे विद्यमान सभापती संतोष लहामगे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या १२ बंडखोरांपैकी केवळ राखी कंचर्लावार यांनी भाजपात प्रवेश घेतला असून अन्य सदस्य वेगळा गट बनवून अद्यापही काँग्रेसमध्येच आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच विविध पक्षांकडून बैठकांचे आयोजन करून तिकीट वाटपाबाबत चर्चा करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)काँग्रेसला गटबाजी ठरणार धोक्याची काँग्रेससाठी चंद्रपूर महानगर पालिकेतील जनाधार अनुकूल असला तरी पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाचे गेल्या पाच वर्षात प्रचंड नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाचे निरीक्षक शिवाजीराव मोघे हे चंद्रपुरात आले असता, त्यांनी इच्छूकांच्या मुलाखती घेऊन ‘त्या’ १२ नगरसेवकांना कुठल्याही परिस्थीत टिकीट दिले जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र त्यांनी घेतलेल्या मुलाखती बेकायदेशिर असल्याचा आरोप आ. विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यामुळे पक्षाअंतर्गत राजकारण आणखी तापले आहे. यावर्षी आ. विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर शहरातील राजकारणात रस घ्यायला सुरूवात केल्याने आतापासूनच गटबाजीचे दर्शन घडायला लागले आहे. तिकीट वाटपाची जबाबदारी कोणावर सोपविली जाते, यावर पक्षातील पुढची स्थिती अवलंबून आहे. असा आहे निवडणूक कार्यक्रममनपा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २७ मार्चपासून सुरुवात होत असून ३ एप्रिलपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. सकाळी ११ ते ३ या वेळात अर्ज स्वीकारले जाणार असून २८ मार्चला गुडीपाडव्यानिमित्त सुट्टी असल्याने त्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारले जाणार नाही. मात्र रविवार २ एप्रिल रोजी सुट्टीच्या दिवशी देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत. ५ एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्राची छाननी करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक ७ एप्रिल आहे. तर अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी ८ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार आहे. भाजपाची स्थिती भक्कमभाजपाची बाजू मागील अडीच वर्षात भक्कम झाली आहे. महापौरपद आयतेच मिळाल्याने महानगर पालिकेवर भाजपाचा फेंडा चढला आहे. वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांंनी स्थानिक राजकारणात बराच रस घेणे सुरू केले आहे. काँग्रेसच्या काळात नरेश पुगलिया यांच्या प्रयत्नाने मिळालेला अडीचशे कोटी रूपयांचा पंचशताब्दी महोत्सवाचा निधी वित्तमंत्र्यांनी रद्द केला. त्या ऐवजी वेगळ्या हेडखाली निधी उपलब्ध करून दिला. भाजपा सत्तेत असल्याने आणि दोन मंत्री शहरात असल्याने भाजपाची राजकीय स्थिती भक्कम आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सर्वच पक्षांकडून बुधवारीच विविध ठिकाणी बैैठकांचे आयोजन करण्यात आले. ‘त्या’ १२ नगरसेवकांविरूद्ध न्यायालयात याचिकाचंद्रपूर महानगर पालिकेमध्ये काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले एकूण २६ नगरसेवक असले तरी १२ नगरसेवक भाजपाच्या बाजूने उभे आहेत. त्यांच्याविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल असून त्यावर अद्याप कसलाही निर्णय झालेला नाही.
मनपासाठी १९ एप्रिलला मतदान, २१ ला मतमोजणी
By admin | Updated: March 23, 2017 00:32 IST