शंकरपूर : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. महाराष्ट्र होरपळून निघत आहे, महाराष्ट्रात कोविड-१९ रुग्णांची संख्या लाखाच्या घरात गेली असून, आरोग्य व्यवस्थेची दानादान होताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने कडक लॉकडाऊन केले असले तरी ग्रामपंचायतनेही काही पावले उचलली आहे. काही गावांमध्ये अजूनपर्यंत कोरोनाने शिरकाव केलेला नाही किंवा ज्या गावांमध्ये रुग्ण आढळले नाही. त्या गावात गावकऱ्यांनी स्वतःच्या गावाच्या रक्षणासाठी जबाबदारी घेतलेली आहे. याच आनुषंगाने चिमूर तालुक्यातील बोडदा या ग्रामपंचायतीने एक नवीन पाऊल उचलले आहे. ग्रामपंचायतीमध्ये नऊ सदस्य असून, दोन हजारांच्या आसपास गावांतील लोकसंख्या आहे. गावांमध्ये गावाच्या प्रवेशद्वारावरच झाडाचे काटेरी कुंपण तयार करण्यात आले आहे. या गावांमध्ये इतरत्र कोणत्याही बाहेर गावच्या व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात येत आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण कामे वगळता इतर गावचे व्यक्ती या गावांमध्ये दिसल्यास ग्रामपंचायतीद्वारे ५०० रुपये दंड आकारण्यात सुद्धा येत आहे. या गावाने घेतलेला हा निर्णय केलेली कृती इतर गावासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरते काय हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
कोरोनाला रोखण्यासाठी गावाने घातले काटेरी कुंपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:29 IST