कोरपना : कोरपना पंचायत समितीची वार्षिक आमसभा शनिवारी स्थानिक तहसील कार्यालयात पार पडली. या आमसभेसाठी गावागावांतून सरपंच आपल्या समस्या मांडण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येकांनी आपल्या गावातील पाणी टंचाईची भयावह स्थिती मांडत रोष व्यक्त केला. यामुळे चांगलाच गदारोळ झाला.या सभेत पाणीपुरवठा, कृषी विभाग या दोनच विषयावर सभा दिवसभर चालली होती. पाणी प्रश्न गाजला. गावा-गावातील महिला पाण्यासाठी भंटकती करीत आहे. तेव्हा आमदार संजय धोटे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. ही समस्या तात्काळ मार्गी लावण्याचे ठरले. या सभेच्या अध्यक्षस्थानी क्षेत्राचे आमदार संजय धोटे होते. जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती नीलकंठ कोरांगे, पंचायत सभापती रवी गोखरे, उपसभापती मनोहर नैताम, आबीद अली, अरुण निमजे, उत्तम पेचे, तहसीलदार पुष्पलता कुमरे, संवर्ग विकास अधिकारी संघमित्रा कोल्हे, रमेश मालेकर, नारायण दिवरकर, किशोर बावणे, पुरुषोत्तम गोंगले, अरुण मडावी, विशाल गज्जलवार, यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, पटवारी उपस्थित होते. सुरुवातीलाच पाणी प्रश्न सभेत पेटल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. उडवाउडवीची उत्तरे देण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न झाला. मात्र सरपंचांनी यावर संताप व्यक्त केला. सोनुर्ली गावात १८ वर्षांपासून पिण्यास पाणी मिळत नाही. पाण्याची टाकी शोभेची वास्तु ठरली आहे. मांगलहिरा गावकरी एक किलोमीटर अंतरावरुन पाणी आणतात. धानोली गावात २५ लाख रुपये खर्च होऊन पाणी गावात पोहचलेच नाही. कृषी विभागाचा विषयात शेतकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. मात्र कृषी अधिकारीकडे उत्तरच नाही. कृषी अधिकारी हा शेतकऱ्यांना तारक नाही तर मारक असल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला. किशोर बावने यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली. मिरचीच्या बी-बियाणात ज्या कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली, त्या कंपनीच्या विरोधात तक्रार केली. मात्र कृषी अधिकारी उलट कंपनीच्या हिताचे भाषा बोलतात, असा आरोप केला. शेतकऱ्यांना शांत करत आमदारांनी न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. (शहर प्रतिनिधी)इतर प्रश्नांवर चर्चाच नाहीमोठ्या आशेने आलेले नागरिक परत गेले. या ठिकाणी जनहिताचे प्रश्न मार्गी लागलेच नाही. आरोग्य, शिक्षण, पंचायत विभाग आदी विषय न घेता दोनच विषयात सभा गुंडाळली. पंचायत समितीची कार्यप्रणाली कुचकामीहागणदारीमुक्त असलेल्या गावातील सरपंचांचा सत्कार कोरपना पंचायत समितीने आयोजित केला. मात्र सरपंचांना निमंत्रणच मिळाले नाही. यावर या सभेत रोष व्यक्त करण्यात आला. कर्मचाऱ्यांची झोप कधी उघडणार?तालुक्यात अशा विविध समस्या असताना याकडे जातीने लक्ष देऊन येथील शेतकरी, शेतमजूर यांना न्याय द्यावा. येथील कर्मचारी सुस्तावलेला, झोपलेला आहे. त्याला झोपेतून उठवून सामान्यांना न्याय द्यावा, अशी मागणी नागरिकांनी आमदारांकडे केली..
आमसभेत पाणी प्रश्नावर गदारोळ
By admin | Updated: March 7, 2016 00:36 IST