वरोरा : शहरात शिवभोजन थाळीचा तुटवडा
कोरोनाच्या अस्मानी संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले, तर हातावर पोट असणाऱ्या मजुरांची दैना झाली. राज्यात १५ एप्रिलपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. गरिबांना मिळणारी दहा रुपयांची शिवभोजन थाळी एक महिन्याकरिता मोफत देण्यात येणार असल्याची घोषणाही झाली. मात्र, वरोऱ्यात या योजनेचे तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे.
रोजी मंदावली तरी रोटी थांबणार नाही अशी घोषणा शासनाकडून करण्यात आली. नोंदणीकृत सात कोटी लोकांना तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मिळणार असल्याचीही ग्वाही देण्यात आली. शासनाच्यावतीने तसे निर्देश प्रशासनाला देण्यातसुद्धा आले; मात्र दहा दिवस लोटूनही या सर्व घोषणा कागदावरच राहिल्या. अजूनपर्यंत गरिबांच्या दारापर्यंत ना गहू-तांदूळ पोहोचले नाही, शिवथाळी पुरेशा प्रमाणात मिळत आहे. गरिबांच्या पोटाची अवस्था बिकट झाली आहे.
देशात पहिल्या लाॅकडाऊनच्या काळात अनेक सामाजिक संस्थांनी, गरीब आणि कष्टकऱ्यांची भोजनाची व्यवस्था नि:शुल्क केली होती. त्यामुळे पोटाचा प्रश्न काही प्रमाणात सुटला होता. यावेळी मात्र सामाजिक आणि राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पुढे येताना दिसत नाही. वरोरा शहरामध्ये दोन शिवभोजन केंद्रे आहेत. त्यांची एकूण क्षमता ३०० थाळींची असून, गरजू व्यक्ती त्या ठिकाणी सकाळपासूनच रांगा लावतात. सामाजिक दुरतेचा अभाव आणि बिना मास्क या गरिबांचे संपूर्ण कुटुंब रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अवघ्या पंधरा-वीस मिनिटांतच या थाळ्या संपत असून, बाकीच्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहेत. कोरोनाची ही स्थिती किती काळ राहील हे अनिश्चित असून, आता पोट कसे भरावे या विवंचनेत हे कष्टकरी सापडले आहेत.
क्षमता वाढविण्याची मागणी करणार : तहसीलदार
या संदर्भात तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांना विचारले असता शहरात दोनच केंद्रे असून, त्यांची क्षमता ठरलेली आहे असे ते म्हणाले. त्यांची वाढीव क्षमता जिल्हाधिकारी मंजूर करतात, त्यामुळे यांच्याकडे मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच गरिबांना मिळणारा गहू व तांदूळ अद्याप रेशन दुकानात पोहोचला नसल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशासनाकडे मागणी करणार : शिवसेना
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते म्हणाले की, प्रशासन कमी पडत असेल तर शिवसेना आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गरिबांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येईल, तसेच प्रशासनाकडे अतिरिक्त शिवभोजन थाळीची मागणी करण्यात येईल.