अनेकांच्या घरात पाणी घुसले : वाहनधारकांची तारांबळचंद्रपूर : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाने चांगलाच दम आणला. शनिवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु होती. दरम्यान सायंकाळी ५ वाजतापासून धुवादार पावसाने हजेरी लावल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांच्या घरात पाणी घुसल्याचीही माहिती मिळाली आहे.शनिवारी सकाळपासूनच सुर्यनारायणाचे दर्शन झाले नाही. सकाळी ८ वाजताच्या दरम्यान पावसाने हजेरी लावल्यानंतर दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. सायंकाळी तब्बल दोन तास दमदार पाऊस बसरला. यामुळे नाल्या तुडूंब भरून वाहू लागल्या. नाल्यांतील पाणी रस्त्यावर आल्याने चंद्रपूर शहरातील बहुतांश रस्ते जलमय झाले. रस्त्यावरून पाणी असल्याने अनेकांच्या दुचाकी, कारमध्ये पाणी घुसल्याने वाहनधारकांना कमालिचा त्रास सहन करावा लागला. शहरातील आझाद बाग परिसरामध्ये रस्त्यावरून दोन ते अडिच फूट पाणी होते. शहराचा महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या या रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक पुर्णपणे विस्कळीत झाली होती. काही वाहनधारक नालीमध्ये पडल्याने जखमी झाले. शहरातील काही रस्त्यांचे बांधकाम करण्यात येत असल्याने नाल्या अडविण्यात आल्या आहेत. याचा फटका नागरिकांना बसला. अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. शहरातील घुटकाळा वॉर्ड, जयंत टॉकीज परिसर, आझाद बाग, नगिनाबाग, भिवापूर, बाबूपेठ, समाधीवार्ड आदी परिसरातील रस्त्यांवरून पाणी वाहत होते. इंदिरानगर, कृष्णनगर, बाबुपेठ परिसरातील काही भाग, सिस्टर कॉलनी परिसरातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये आजचा पाऊस सर्वाधिक होता. प्रथमच नदी नाले दुथळी भरून वाहत होते. विशेष म्हणजे, इरई नदीची जलपातळी यावेळी प्रथमच वाढली. जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. रोवणीसाठी हा पाऊस ठिक असला तरी कपाशीसाठी धोकादायक ठरू शकतो, असे काही शेतकऱ्यांचे मत आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. अनेक तलाव मागील आठवड्यापर्यंत अर्धेच भरले होते. (नगर प्रतिनिधी)
चंद्रपुरात धुव्वाधार
By admin | Updated: September 6, 2014 23:38 IST