सिंदेवाही : तुम्हाला माहिती आहे काय ? चंद्रपूर जिल्ह्यातील विकासापासून हरवलेले शहर म्हणजेच सिंदेवाही, अशा आशयाचा संदेश सोशल मीडियावर वायरल झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा सिंदेवाहीतील विविध समस्या चव्हाट्यावर आल्या आहेत.
सिंदेवाहीत एमआयडीसी आहे. मात्र, उद्योग नाही. बेरोजगारांच्या हाताला काम नाही. कृषी, आरोग्य, शिक्षण, या क्षेत्रातही अनेक समस्या आहेत. उच्च दर्जाचे शिक्षण नसून वंचित शहर आहे. शहराला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यापासून फक्त शहरातील रस्ते, नाली व स्वच्छता अभियान राबविले जात आहे. परंतु शहरातील औद्योगिक क्षेत्र, बाग-बगीचे व इतर विकास खुंटला आहे. पाच वर्ष कार्यकाळ संपत येत असून, दर्जेदार कामांची सुरुवात झालेली नाही. कोरोनाच्या संकटात असल्याचे कारण समोर ठेवून विकासापासून कोसो दूर आहे. नाविन्यपूर्ण सुशोभिकरण, रोजगार निर्मिती यापासून दूर असलेले शहर म्हणजेच सिंदेवाही. असा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संदेशात सत्यता असल्यामुळे सिंदेवाहीतील नागरिकही प्रशासनाला जागे करण्यासाठी हा संदेश जाणीवपूर्वक वायरल करीत आहेत.