जिल्ह्यात आतापर्यंत २८ हजार ११० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामध्ये २७ हजार ४३२ जिल्ह्यातील, ५१३ जिल्ह्याबाहेर व ८५ राज्याबाहेरील रुग्ण आहेत. उपचारानंतर २५ हजार ३९० जण कोरोनामुक्त झाले. अॅक्टीव रुग्णांची संख्या दोन हजार २९१ वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाने चाचण्यांची संख्या वाढविल्याने दररोज नवीन अॅक्टिव रुग्णांची भर पडत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गतवर्षी लागू केलेल्या कडक निर्बंधामुळे नागरिकांचे हाल झाले. हातावर पोट असणारे तर कोलमडून पडले. त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न सुरू असतानाच संसर्गाची दुसरी लाट जिल्ह्यात धडकली. अशा अस्वस्थतेच्या कालावधीत भीतीपोटी घरातच दडून राहण्याचा मार्ग कुणीही स्वीकारणार नाही, हेही वास्तव आहे; मात्र रोजगारासाठी बाहेर निघालेल्या १९ ते ४० वयोगटातील तरुण वर्गालाच कोरोना गाठत असल्याचे वास्तव आरोग्य विभागाच्या अहलावातून पुढे आले आहे.
बालकांनाही कोरोनाचा विळखा
जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत ० ते ५ वयोगटातील ४२७ बालकांना कोरोनाने गाठले. कुटुंबातील व्यक्ती पॉझिटिव्ह झाल्यानंतर गृहविलगीकरणातील नियमांचे पालन न केल्याने बालकांना बाधा होत आहे, असे निरीक्षण एका शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यानेच ‘लोकमत’ कडे नोंदविले. त्यामुळे गृहविलगीकरण नियमांचे पालन करण्यासाठी गाइडलाइन असताना पथक व समित्या कागदावरच आहेत काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
तपासण्या पुन्हा वाढविल्या
होळी व रंगपंचमी उत्सवामुळे आरटीपीसीआर व अॅन्टिजन तपासण्यांची संख्या घटली होती; मात्र मंगळवारपासून पुन्हा चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. गुरुवारी दोनही मिळून दोन हजार ५८९ चाचण्या झाल्या. चाचण्यांचा वेग पुन्हा वाढणार असल्याने रुग्णसंख्याही वाढण्याची शक्यता आहे.
वयोगटानुसार रूग्ण संख्या (१ एप्रिलपर्यंत)
० ते ५- ४२७
६ ते १८-२३०८
१९ ते ४०-१२१५५
४१ ते ६०-९७९८
६१ वर्षांवरील- ३४२२