गोवरी: राजुराकडून काही कामानिमित्त साखरीकडे आपल्या स्कुटीने जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकने कट मारल्याने राजुरा येथील अमोल खोके (२७) हा युवक स्कुटीसह दोन पुलाच्या मधात अडकला. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी युवक किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडला.
राजुरा येथील अमोल खोके हा युवक काही कामानिमित्त साखरी गावाकडे जात असताना पोवनी गावाजवळ असलेल्या पुलावर भरधाव वेगात आलेल्या ट्रकने कट मारल्याने दोन पुलाच्या मधात युवक स्कुटीसह खाली कोसळून दोन पुलाच्या मधात अडकला. युवक पुलाच्या मधात अडकल्याची माहिती होताच रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी अमोल खोके या युवकाला पुलामधून बाहेर काढले. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अमोल किरकोळ जखमी झाला. या पुलावर दोन दिवसात तीन अपघात झाले असून, या दोन्ही पुलाच्या मधात दोन फुटाचे अंतर असल्याने हे दोन्ही पूल धोकादायक ठरत आहेत. दोन दिवसापूर्वीच पोवनी गावाच्या जवळील अशाच प्रकारच्या पुलावर कोळशाची वाहतूक करणारा ट्रक दोन पुलाच्या मधात फसला होता.