नीलेश झाडे
गोंडपिपरी : वाघांसाठी नंदनवन ठरलेल्या कन्हाळगाव अभयारण्यात आता रेती तस्करांचा धुडगूस सुरू झाला आहे.
अभयारण्यात येणाऱ्या नाल्यातून वाहनांनी रेतीची चोरी केली जात आहे. रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या या प्रकाराने वन्यजीवांची सुरक्षा धोक्यात आली आहे. या प्रकारावर वन्यजीवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात असताना वनविकास महामंडळाने चुप्पी साधली आहे.
गोंडपिपरी तालुका वनवैभवाने संपन्न आहे. येथे मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्ती आहे. ही खनिज संपत्ती लुटण्यासाठी तस्करांचे मोठे जाळे तालुक्यात आहे. सध्या गोंडपिपरी, धाबा, सुकवासी येथे मार्गाचे काम सुरू आहे. मार्गाच्या कामात अनेक ठिकाणी पाईपलाईनचे कामे करण्यात येत आहे. या कामासाठी लागणारी रेती तस्कर लगतच्या चिवंडा येथील जंगलातील नाल्यातून उपसत आहेत. अगदी कमी वेळात रेती उपलब्ध होत असल्याने हे काम करणारे कंत्राटदारदेखील चिवंडा येथील नाल्यातील तस्करी केलेल्या रेतीला पसंती देत आहेत.
गोंडपिपरी तालुक्यातील कन्हाळगावला शासनाने नुकतेच अभयारण्य घोषित केले आहे. कन्हाळगाव अभयारण्यात येत असलेला चिवंडा जंगल हे वाघांच्या अधिवासासाठी अतिशय उपयुक्त आहे. या भागात अनेक वाघांचा अधिवास आहे. याच चिवंडा येथील जंगलातील नाल्यातून रात्री तस्कर रेतीचा मोठ्या प्रमाणावर उपसा करीत आहेत.
बॉक्स
रात्रभर वाहनांची रेलचेल
रात्रभर येथे मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये जा असल्याने येथील वाघांची पुरती झोप उडाली आहे. शिवाय वाघांच्या सुरक्षेसाठीही अतिशय घातक बाब आहे. हा भाग सध्या वनविकास महामंडळात मोडतो. पण या तस्करीकडे वनविभागाचे पुरते दुर्लक्ष होत आहे. तालुका प्रशासनाने या तस्करांना आशीर्वाद दिला की काय, अशी परिस्थिती झाली आहे. एकीकडे वन्यजीवांच्या सुरक्षेकरिता वरिष्ठ स्तरावरून मोठमोठ्या योजना प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. मात्र दुसरीकडे स्थानिक प्रशासनाच्या आशीर्वादाने वन्यजीवांपुढे नवीनच संकट उभे ठाकले आहे. याप्रकरणी वरिष्ठांनी लक्ष द्यावे व वन्यजींवांना दिलासा द्यावा, अशी मागणी तालुक्यातील वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली आहे.
कोट
कन्हाळगाव अभयारण्यातून झालेल्या रेती चोरीच्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना दिले आहे. येत्या दोन दिवसात मी प्रत्यक्ष या प्रकाराची पाहणी करणार आहे. दोषी असलेल्यांवर कार्यवाही केली जाईल.
- आर्या,
विभागीय व्यवस्थापक,
मध्य चांदा वनविकास महामंडळ.