सुनील आसमवार : ऊर्जानगरात राष्ट्रसंत क्रांतीपर्व स्मृतिदिनचंद्रपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आॅगस्ट क्रांती आंदोलनातून स्वातंत्र्याचा संदेश सर्वदूर पोहचविला. त्यातूनच स्वातंत्र्यासाठी भारतीयांची मने पेटून उठली. त्यामुळे राष्ट्रसंतांची ही भूमिका स्वातंत्र्य लढ्यात मोलाची ठरते, असे प्रतिपादन चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे उपमुख्य अभियंता सुनिल आसमवार यांनी केले.श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखा उर्जानगरच्यावतीने शुक्रवारी सामुदायीक प्रार्थना मंदिर सभागृहात राष्ट्रसंत क्रांतीपर्व स्मृतिदिन आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे उपमुख्य अभियंता सुनिल आसमवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. कल्याण अधिकारी अरविंद वानखेडे, कार्यकारी अभियंता बी.पी. इंगळे, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रदीप अडकीने, शाखाध्यक्ष भाऊराव बावणे, सेवाधिकारी शंकर दरेकर आदी मंचावर उपस्थित होते.याप्रसंगी प्रमुख वक्ते अरविंद वानखेडे म्हणाले, भारताच्या पराधिनतेचे दु:ख राष्ट्रसंतांना बोचत होते. त्यामुळे १९४२ च्या क्रांती आंदोलनात ते उतरले. जनसामान्यांच्या मनात देशप्रेम जागृत करून इंग्रजाविरूद्ध बंड पुकारले. त्यांच्या वाणीत परिवर्तनाची ताकद होती. दुसरे वक्ते बी.पी. इंगळे म्हणाले, राष्ट्रसंतांनी स्थापन केलेले श्री गुरुदेव सेवा मंडळ मानवधर्म जागवणारे आहे. राष्ट्राप्रति आपली कर्तव्ये काय आहे, याची जाणिव करून देणारे हे मंडळ व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने उत्तम कार्य करीत आहे. अडकिने यांनी १९४२ च्या आॅगस्ट क्रांती आंदोलनातील राष्ट्रसंतांची भूमिका सांगून गीताचार्य तुकारामदादांची अड्याळटेकडी ही खऱ्या अर्थाने परिवर्तनाचे भूवैकुंठ केंद्र असून गीताचार्यांनी कृतीवर भर दिला होता, असे ते म्हणाले. समारंभात चिमूर-आष्टी क्रांती संग्रामाचे शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी)
आॅगस्ट क्रांती आंदोलनातून राष्ट्रसंतांनी स्वातंत्र्य संदेश पोहोचविला
By admin | Updated: September 8, 2015 00:53 IST