रुग्णांना पिण्याचे पाणी नाही : दवाखानाच पडला आजारीगडचांदूर : गडचांदूर रुग्णालय रामभरोसे असून पिण्याच्या पाण्याचीसुद्धा येथे कमतरता आहे. रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पिण्यासाठी बाहेरून पाणी आणावे लागत आहे. सरकारी दवाखान्यातील हे वास्तव रविवारी रात्री निदर्शनास आले.नजीकच्या बिबी येथील तुळशीराम बावणे (४६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. तब्बेत अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र तेथेच त्यांची प्राणज्योत मावळली. शवविच्छेदनासाठी उशीर होतो म्हणून गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिल्याने त्यांचा मृतदेह गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात आणला. रात्री २ वाजताच्या सुमारास गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना व रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांना बाहेरून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागली. गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयच आजारी पडल्याने याठिकाणी सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहे. येथे डॉक्टरांचा उर्मटपणा रुग्णांना दिलासा न देता रक्तदाब वाढवणारा ठरतो. अनेकदा गडचांदूरातील पुढारी उपोषण व आंदोलने करतात. मात्र त्याचा रुग्णालयाच्या विकासात कसलाही फरक आतापर्यंत पडला नाही. जेथे रुग्णांना पिण्यासाठी पाणी नाही, त्या दवाखान्याची अवस्था काय असेल, हे सांगण्याची गरज नाही. गडचांदूर व जिवती परिसरातील रुग्णांसाठी आशेचा किरण म्हणून हा एकमेव दवाखाना आहे. मात्र या दवाखान्याकडून रुग्णांनी काय अशा करावी, हा प्रश्नच आहे. नगर परिषदेतील रुग्णालय समिती अनेकदा भेट देतात. मात्र कोणत्या समस्या जाणून घेतात, हे त्यांनाच ठाऊक आहे. राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, नगराध्यक्ष, पदाधिकारी व रुग्णालय समिती डोळे बंद करून स्वत:ची पोळी शेकून घेण्यापुरतीच राहिल्याने सामान्य रुग्णांनी कोणाकडे धाव घ्यावी, हा प्रश्नच आहे. (शहर प्रतिनिधी)
गडचांदूर ग्रामीण रुग्णालय रामभरोसे
By admin | Updated: March 8, 2016 00:42 IST