सखी मंचचा उपक्रम : रोटरी क्लब, गुरूदेव सेवा मंडळ, समाजशास्त्र अभ्यास मंडळ, विवेकानंद विद्यालयाचाही सहभागभद्रावती : बहिणींनी भावांना राख्या बांधल्या. भावांनी बहिणींना ओवाळणी घातली. त्या संपूर्ण ओवाळणीची रक्कम दोन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत म्हणून देण्यात आली. त्या कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला होता. आठवणीचे काय त्या बाकी होत्या. मिळालेल्या मदतीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो क्षण होता. बोलता बोलता कंठ दाटून आला. टचकन डोळ्यात पाणी आले होते. त्या दोघींच्या भावना व्यक्त करीत होते. प्रसंग होता सामूहिक रक्षाबंधन सोहळ्याचा.लोकमत सखी मंच भद्रावती, रोटरी क्लब आॅफ भद्रावती, श्री गुरुदेव सेवा मंडळ भद्रावती व समाजशास्त्र अभ्यास मंडळ, विवेकानंद महाविद्यालय भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात शुक्रवारी सामूहिक रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यातून जमा झालेली ओवाळणी महिला भगिनींनी तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना दिली.सामाजिक बांधिलकीची जोपासना करणाऱ्या या भावस्पर्शी सोहळ्याच्या व्यासपिठावर नगराध्यक्ष अनिल धानोरकर, विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोराचे संचालक जयंत मोरेश्वर टेमुर्डे, रोटरी क्लब आॅफ भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. प्रविण केशवानी, सचिव अविनाश सिध्दमशेट्टीवार, प्राचार्य डॉ. एन. उमाटे, लोकमत सखी मंचच्या तालुका अध्यक्ष अल्का वाटेकर, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ गावंडे, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील नलिनी ठेंगणे, विद्या लेडांगे, प्रा. अमोल ठाकरे, जाकीर शेख, सुनिल पोटदुखे, जावेद शेख, सुशिल देवगडे, रत्नाकर साठे, किशोर खंडाळकर, किशोर गोवारदिपे, प्रदीप बंग, न.प. उपाध्यक्ष प्रफुल चटकी, किशोर पत्तीवार, डॉ. आनंद निते, डॉ. रमेश मिलमिले, प्रविण महाजन, विवेक आकोजवार उपस्थित होते.महाविद्यालयाच्या प्रांगणात तीन वर्तुळात खुर्च्या टाकून बैठक व्यवस्था करण्यात आली होती. खुर्च्यावर शहरातील अनेक मान्यवर, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना बसवून लोकमत सखी मंचच्या भगीनी व विद्यार्थिनींनी त्यांना सामुहिक राख्या बांधल्या. बंधुराजांकडून मिळालेल्या ओवाळणीच्या १० हजार २०० रुपये रकमेपैकी स्व. मुकुंदा ठेंगणे (रा. नंदोरी) यांच्या पत्नी नलिनी मुकुंदा ठेंगणे तसेच स्व. नीळकंठ लेडांगे (रा. टाकळी) यांच्या पत्नी विद्या नीळकंठ लेडांगे या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना प्रत्येकी ५ हजार १०० रुपये तसेच साडी व चोळी मदत म्हणून देण्यात आली. या क्षणी दोघींनाही गहिवरून आले होते. त्या अत्यंत भावूक झाल्या होत्या. रक्षाबंधन सोहळ्यात परस्परांना स्नेह सूत्रात बांधून घेत बहिणींच्या रक्षणाची जबाबदारी घेवून बंधूराजाकडून मिळणारी ओवाळणी ही या भगिनींकडून आपल्या परिसरातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील त्या दोन बहिणींचा उद्ध्वस्त झालेला संसार सावरण्यासाठी त्यांना मदत म्हणून देण्यात आली. आयोजकांचा हा भावस्पर्शी उपक्रम खरोखरच सामाजिक बांधिलकी जोपासणारा ठरला. संचालन प्रा. डॉ. ज्योती राखुंडे, प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एन. उमाटे तर आभार प्रा. अमोल ठाकरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे सर्व सदस्य, लोकमत सखी मंचच्या सदस्य, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य तसेच विवेकानंद महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. त्यानंतर लोकमत सखी मंचच्यावतीने आनंद मेळावा पार पडला. (तालुका प्रतिनिधी)समाजातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचा या कार्यक्रमाने आत्मविश्वास वाढविला. आम्हाला एक प्रकारचे बळ दिले. अशाप्रकारचे उपक्रम राबविण्यास आमच्या सारख्या इतरही अभागी बहिणींना जगण्याबाबतचा आत्मविश्वास प्राप्त होईल. आमच्या पाठीशी आपण उभे राहिलात, आपुलकी दाखविली, प्रेम व्यक्त केले याबद्दल आम्ही आपले आभारी आहो.- नलिनी मुकुंद ठेंगणे, रा. नंदोरी
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मिळाली रक्षाबंधनाची ओवाळणी
By admin | Updated: September 8, 2015 00:54 IST