तालुक्यातील सर्वात मोठी व राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या येथील ग्रामपंचायतीचा निकाल, भाजपसाठी धक्कादायक व अनपेक्षित लागला आहे. गल्ली ते दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असल्याने गेल्या पाच वर्षांत गावाच्या विकासाची अनेक कामे झाली आहेत. मात्र, मतदारांनी याकडे फारसे लक्ष दिलेले नाही, असे दिसते.
जनसंघाच्या काळापासून अभेद्य असलेल्या भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने प्रथमच मुसंडी मारली. येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्रीधर पकमोडे याना वॉर्ड क्र. ४ या भाजपच्या सुरक्षित क्षेत्रातून पराभव पत्करावा लागला. १३ सदस्यांच्या या ग्रामपंचायतीत काँग्रेस १०, भाजप दोन व अपक्ष एक असे नवनिर्वाचित सदस्य आहेत. या ग्रामपंचायतीत रोहिणी भाष्कर ठिकरे या प्रथम अपक्ष महिला सदस्य वॉर्ड क्र. २ मधून निवडून आल्या आहेत, तर निवडणूक रिंगणात असलेल्या १५ महिला उमेदवारांपैकी आठ महिलांचे माहेर व सासर गावातच आहे. यापैकी अंजना आत्राम, निखिता खोब्रागडे, प्रणाली धरणे, पल्लवी ठिकरे आणि ममता कागदेलवर या पाच महिलांनी बाजी मारली असून, त्या काँग्रेस प्रणित आघाडीतून निवडून आल्या आहेत.