चंद्रपूर : कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. त्यासोबतच दुसऱ्या लाटेत मृत्यूदर वाढत आहे. हा आकडा दिवसाला २५ वर पोहाेचला आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. त्यामुळे अधिकची आरोग्य यंत्रणा वाढवण्याकरिता रेल्वे विभागाने पुढे येऊन मदत करण्याची विनंती खासदार बाळू धानोरकर यांनी केली असून यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे निवेदन दिले आहे.
कोरोना उद्रेकामुळे आरोग्य व्यवस्थेची स्थिती हाताबाहेर जाण्याच्या मार्गावर आहे. शासकीय रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय व खासगी रुग्णालयामध्ये देखील बेडस अभावी रुग्णांचे हाल सुरु आहेत. कोरोना संसर्ग वेगाने पसरत असून व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड रुग्णांना सर्वत्र कमी पडत आहेत. आनंद विहार दिल्ली, शकूर बस्ती, दिल्ली तसेच महाराष्ट्रातील नंदुरबार येथे रेल्वे प्रशासनाच्या वतीने कोविड रुग्णांसाठी प्लॉट फॉर्मवर रेल्वे कोचे लावून कोरोना बाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध करून दिले आहेत. कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर रेल्वे स्थानक तसेच चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर रेल्वे कोचेस ठेवून कोरोना बाधितांची सोय होऊ शकते. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महाराष्ट्र शासनाने रेल्वे मंत्रालयाकडे मागणी केली आहे. त्यात चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करण्याची विनंती खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. मागणी पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील हजारो नागरिकांना कोरोना उपचार सहज उपलब्ध होण्यास सुविधा मिळणार आहे.