वीज वितरणचे जनित्र बनले धोकादायक
जिवती : सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने ग्राहकांना शॉक देणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे जिवतीसह अनेक गावात डीपी रात्रंदिवस सतत उघड्या राहतात. या शिवाय विविध विभागांत घराजवळून जाणाऱ्या तारांमुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देण्यासाठी वीज वितरण कंपनीकडे वेळ नसल्याचे चित्र आहे.
रस्त्यावरील बांधकाम साहित्याने अपघातात वाढ
चंद्रपूर : शहरात बहुतांश नवीन वस्त्यांमध्ये घरांचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर लागणारे साहित्य रस्त्यावरच टाकण्यात येत असल्याने, वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. नियमानुसार, असे साहित्य रस्त्यावर टाकता येत नाही. मात्र, याकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे.
रोजगार उपलब्ध करण्याची मागणी
चंद्रपूर: जिल्ह्यातील उद्योगांतर्फे स्थानिक युवकांवर करण्यात येणारा अन्याय दूर करून, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रात नोंद केलेल्या जिल्ह्यातील स्थानिक युवकांना पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी बेरोजगार युवकांनी केली आहे.
अनियमित बसफेऱ्यांमुळे प्रवाशांचे हाल
चंद्रपूर : नागभीड मार्गावरील एसटी महामंडळाच्या बससेवा फारच कमी असून, अनियमित आहेत. त्यामुळे प्रवाशाचे अतिशय हाल होत असून, नाईलाजाने प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. लग्नसराई व विद्यार्थ्यांची शाळा लक्षात घेता, महामंडळाने नागभीड-चंद्रपूर मार्गावरील बसफेऱ्या वाढवून बससेवा वेळेवर सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.