राजोली : येथील पशुधन विकास अधिकाऱ्याचे पद गेल्या तीन वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे परिसरातील गोपालक व शेतकरी वर्गांना आपल्या आजारी गुरावर नाईलाजाने खासगीत औषधोपचार करताना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
येथील पशुचिकित्सालयात सध्या एकच परिचर कार्यरत आहे. दवाखान्यात येणाऱ्या परिसरातील सर्व रोगग्रस्त जनावरांवर तोच गेल्या तीन वर्षांपासून उपचार करताना दिसतो. त्यामुळे नागरिकांत आणि पशुपालकात संभ्रम होत असून, जनावराच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कृषी व पशुसंवर्धन खात्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी व विविध लाभांच्या योजनांची अंमलबजावणी पशुधन विकास अधिकाऱ्याअभावी योग्य प्रकारे होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे योजनेचे खरे लाभार्थी डावलले जात असल्याच्या तक्रारी आहेत, शिवाय या परिसरातील अनेक गावांत चांदा ते बांदा योजनेंतर्गत दुधाळ गायीचे वाटप करण्यात आले आहे, परंतु पशुधन विकास अधिकाऱ्यांअभावी बऱ्याच गायी रोगनिदान न झाल्यामुळे मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळे पशुधन विकास अधिकाऱ्यांसह येथे मंजूर असलेली सर्व रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, अशी शेतकऱ्याची मागणी आहे.