नागभीड नगर परिषद : प्रशासकाने लक्ष देण्याची मागणीनागभीड : तालुक्यातील तुकूम या गावाचाच एक भाग असलेल्या बेघर वस्तीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वस्तीतील जलस्रोत पूर्ण निकामी झाल्यामुळे पाणी संकट ओढवले असून महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.नागभीडपासून दोन-अडीच किमी अंतरावर ही वस्ती असून वस्तीत ६० ते ७० घरे आहेत. शेती आणि पशुपालन येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. या वस्तीत तीन विंधन विहिरी निकामी झाल्या आहेत. वस्तीतच एक विहिर आहे, पण ती सुद्धा आटली आहे. वस्तीत असलेले तिन्ही जलस्त्रोत निकामी झाल्याने वस्तीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याने बेजार झालेल्या येथील महिलांनी भारती बनकर यांच्या नेतृत्वात नागभीड येथे येवून नागभीड पं.स.चे माजी उपसभापती दिनेश गावंडे यांना गाठले व आपबिती कथन केली. दिनेश गावंडे यांनी लगेच तहसीलदार समीर माने तसेच नागभीड पं.स. चे पाणीपुरवठा अधिकारी वनवे यांना माहिती दिली. तहसीलदार माने यांनी जिल्हाधिकारी यांच्या परवानगीनुसार गावात टँकर सुरु करु असे तर पाणीपुरवठा अधिकारी वनवे यांनी सोमवारी विंधन विहिरी दुरुस्ती करणार, असे सांगितल्याचे दिनेश गावंडे यांनी सांगितले.सद्यस्थितीत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफल्ल खापर्डे यांच्या मदतीने गावंडे यांनी शनिवारी एका टँकरद्वारे तीन हजार लीटर पाणी गावकऱ्यांना उपलब्ध करुन दिले. प्रशासनाकडून जोपर्यंत गावकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध करुन देण्यात येत नाही, तोपर्यंत आपल्याकडून दररोज एक टँकर पाणी उपलब्ध दिल्या जाईल असे, दिनेश गावंडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तुकूम हे गाव नवनिर्मित नागभीड नगरपरिषदेत समाविष्ट करण्यात आल्याने येथील ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे तुकूम येथे निर्माण झालेल्या समस्येचे निवारण नगरपरिषदेचे प्रशासक करु शकतात. प्रशासक समीर माने यांनी याबाबत त्वरीत ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
तुकूमच्या बेघर वस्तीत तीव्र पाणीटंचाई
By admin | Updated: April 25, 2016 00:54 IST