कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता टाळेबंदी करण्यात आली. त्यानंतर टाळेबंदीमध्ये काही प्रमाणात शिथिलता करीत मालवाहतूक, प्रवासी वाहतूक, शाळा, महाविद्यालय, पोहण्याचे तलाव, व्यायाम शाळा व मंगल कार्यालय सुरू करण्यात आले. मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यादरम्यान सामाजिक अंतर अत्यावश्यक केले आहे. त्यानंतर वधू- वराकडील ५० व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाते. परंतु ५० पेक्षा कितीतरी पटीने नागरिक उपस्थित राहून नियमांना तिलांजली देत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्याने महसूल प्रशासन वाढत्या गर्दीवर आळा घालण्याचा प्रयत्न करीत आहे. कटाक्षाने ५० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देत आहे. त्याची एक प्रत संबंधित पोलीस स्टेशनला पाठविण्यात येत आहे. त्यानंतर पोलीस कर्मचारी तिथे उपस्थित राहून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या नियमाचे पालन होत आहे किंवा नाही, याची शहानिशा करून कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
बॉक्स
केटरर्स व आयोजकांचा करारनामा तपासणार
परवानगी ५० व्यक्तीची असताना विवाहात शेकडो लोक उपस्थित राहून भोजन करतात. आयोजक याबाबतीत केटरर्ससोबत करारनामा करतात. हा करारनामा तपासणे गरजेचे आहे. त्यावरूनच सोहळ्यातील नागरिकांची उपस्थिती लक्षात येईल.
बॉक्स
साक्षगंध व इतर कार्यक्रमास परवानगी नाही
विवाह सोहळा वगळता इतर कोणत्याही कार्यक्रमास परवानगी नसताना साक्षगंध व इतर कार्यक्रम शेकडो लोकांच्या उपस्थितीत होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना विषाणू कायमचा संपला काय, अशी चर्चा केली जात आहे.