खांबाडा : वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे उन्हाळा आला की, पाण्याची टंचाई भासते. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. दरम्यान, अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर लालनाला प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आल्याने पोथरा नदी वाहू लागली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला आहे.दरवर्षी उन्हाळा आला की महिलांची पाण्यासाठी पायपीट होते. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने याठिकाणी भारत निर्माण योजनेअंतर्गत पाण्याची सुविधा निर्माण केली. या योजनेमुळे काही प्रमाणात पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी दरवर्षी वाढत्या लोकसंख्येमुळे व गावातील चढउतार भागामुळे पाण्याची कमतरता भासत असते. दरवर्षी उन्हाळा आला की, या परिस्थितीवर कशी मात करावी, असा प्रश्न गावकऱ्यांना पडतो. दरवर्षीच महिला ग्रामपंचायतीवर पाणी प्रश्न घेऊन एकजुटीने धडकतात. परंतु ग्रामपंचायतीने पाणी समस्या निपटून काढण्यासाठी आजपर्यंत ठोस असे कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलले नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकावे लागते.अखेर महिलांनी तंटामुक्त गाव समितीकडे धाव घेतली. कारण आजपर्यंत या समितीने महिलांच्या प्रश्नाकडे सतत लक्ष देऊन महिलांना न्याय मिळवून दिले आहेत. या अगोदर तंटामुक्त समितीने पुरस्काराच्या रकमेतून दोन वॉर्डामध्ये हातपंप देऊन पाणी समस्या सोडविली आहे. तसेच सन २००९ मध्ये तंटामुक्त गाव समितीच्या पाठपुराव्याने चंद्रपुरचे तत्कालिन जिल्हाधिकारी प्रदीप काळभोर यांनी संबंधित विभागाला संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता लाल नाला प्रकल्पाचे पाणी तातडीने सोडण्यात यावे, असे आदेश दिले होते. या आदेशानुसार कोरडी पडलेली पोथरा नदी वाहू लागली होती. बंद पडलेली नळयोजना पुर्ववत सुरू झाली होती. या बाबीची जाण ठेवून महिला समितीने पाणी प्रश्नाबद्दल चर्चा केली. त्यानंतर समितीने पाठपुरावा केल्यानंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांनी लाल नाला प्रकल्पातील पाणी सोडण्याचे आदेश दिले. (वार्ताहर)
अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने लालनाला प्रकल्पाचे पाणी सोडले
By admin | Updated: June 13, 2014 00:03 IST