केवळ बेजबाबदारपणा : अन्यथा पावसाळ्यात पुन्हा बॅक वॉटरचा धोकालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील वेकोलि प्रशासन राज्य शासन, जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाची पायमल्ली करीत आहे. वेकोलिने आपल्या प्रदूषणाने नागरिकांचे आयुष्यच कमी करून टाकले आहे. चंद्रपूरलगत वेकोलिने भलेमोठे ओव्हरबर्डन केले आहे. ते आतातरी पावसाळ्यापूर्वी काढणे गरजेचे आहे.विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी चंद्रपुरात भिषण पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री चंद्रपुरात आले असताना त्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वेकोलिला ओव्हरबर्डन तात्काळ हटविण्याचे निर्देश दिले होते. मात्र वेकोलिचे ओव्हरबर्डन अद्याप दिमाखाने उभेच आहे. चंद्रपूरलगत असलेल्या माना खाण परिसरात व इरई नदीपात्रालगत वेकोलिने मातीचे मोठमोठे ढिगारे तयार केले आहे. वर्षांनुवर्षापासून याच ठिकाणी माती टाकण्यात येत असल्यामुळे हे ओव्हरबर्डन महाकाय झाले आहे. या ओव्हरबर्डनमुळे इरई नदीचे नैसर्गिक पात्र बदलत चालले आहे. परिणामी पावसाळ्यात चंद्रपूरकरांना नेहमीच बॅकवॉटरचा सामना करावा लागतो व पूरपरिस्थिती निर्माण होते. ४० टक्के चंद्रपूरकरांना याचा दरवर्षी फटका बसतो. २०१३ मध्ये चंद्रपुरात तीन वेळा पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चंद्रपूरचा दौरा करीत पुराची पाहणी केली होती. यावेळी काहींनी पुराला वेकोलिचे ओव्हरबर्डनही कारणीभूत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिले होते. त्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वेकोलिला सदर ओव्हरबर्डन तात्काळ हटविण्याचे निर्देश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही वेकोलिने या संदर्भात कुठलेही पाऊल उचलले नाही. उल्लेखनीय असे की निरीच्या चमूनेही चंद्रपूरच्या प्रदूषणाची पाहणी केली असता त्यांनीही वेकोलिच्या ओव्हरबर्डनमुळे पूरपरिस्थिती व प्रदूषण होत असल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वेकोलिला नोटीस देऊन सदर ढिगारे ४५ मीटरपर्यंत हटविण्यास सांगितले होते. काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात केवळ मुंगोली, बल्लारपूर व पद्मापूर येथेच नदीचा गाळ काढून ढिगारे हटविण्याचा अल्पसा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसते. परंतु चंद्रपुरात पुरासाठी कारणीभूत असलेले माना खाणीमुळे निर्माण झालेले ढिगारे अद्याप हटविण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे. कायदा काय म्हणतो ?जल प्रदूषण कायदा १९७४ कलम ३३ प्रमाणे कोळसा खाणीचे प्रदूषित पाणी नदीत किंवा नाल्यात सोडता येत नाही. पूर रेषेच्या आत ढिगारे ठेवता येत नाही. त्यासाठी मजबुत संरक्षक भिंत बांधावी लागते. दूषित पाणी साठविण्यासाठी तळे आणि ओव्हरबर्डनवर वृक्षारोपण करावे लागते. परंतु वेकोलिने कधीच याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे चंद्रपूर सातत्याने प्रदूषित होत राहिले व पुराचा सामना करीत राहिले.
पावसाळ्यापूर्वी वेकोलिचे ओव्हरबर्डन काढणे गरजेचे
By admin | Updated: May 17, 2017 00:39 IST