२० हेक्टर जागेवरील २२ हजार रोपे जळाली
पळसगाव (पि) : चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या बोळधा येथील वनविभागाचे मिश्र रोपवन वणव्याच्या आगीत जळून खाक झाले. हे रोपवन शिवनपायली या गावाला लागून असून २० हेक्टरमध्ये होते. आग इतकी भयानक होती की रोपवन जाळून लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचली; परंतु शेतकऱ्याचे नुकसान झाले नाही.
सन २०१९ ला वनविभाग ब्रह्मपुरी अंतर्गत, वनपरिक्षेत्र तळोधी (प्रादेशिक), उपक्षेत्र, नेरी निमक्षेत्र बोळधा कक्ष क्र. ४२४ येथे राज्य योजनाअंतर्गत वनीकरण भरगच्च कार्यक्रम राबविण्यात येऊन मिश्र रोपवन पावसाळ्यात २० हजार हेक्टर जागेमध्ये लावण्यात आले. यात एकूण २२ हजार अनेक प्रजातीचे रोपे लावण्यात आले होते; परंतु १६ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता लागलेल्या आगीमध्ये वाऱ्याच्या झुळकीत संपूर्ण रोपवन आगीच्या कवेत आले आणि संपूर्ण रोपवन आगीत जाळून खाक झाले. तसेच या रोपवनात असलेली तत्सम प्रकारची अनेक झाडे आणि वनस्पती जळून नष्ट झाल्या.
ही आग कशी लागली याची सविस्तर माहिती मिळाली नाही. वनविभागाचे रोजंदारी मजूर हे रोपवनाच्या सुरक्षेसाठी काठावर कचरा साफ करून पेटवीत होते, असे शिवनपायली येथील गावकऱ्यांनी सांगितले. १६ फेब्रुवारीला मजुरांनी आग लावली आणि आंब्याच्या झाडात जेवायला बसले. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण करीत संपूर्ण रोपवनाच्या परिसराला कवेत घेतले. मजुरांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला; पण ती आटोक्यात आली नाही. यात शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. वन विभागाने याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी शिवनपायली आणि परिसरातील गावकऱ्यांनी केली आहे.