भेजगाव : येथून जवळच असलेल्या मूल तालुक्यातील उथळपेठ येथील रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या पांदण रस्त्याच्या कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी संवर्ग विकास अधिकारी व सभापती पेंदाम यांच्याकडे करुन चौकशीची मागणी केली आहे.आर्थिक वर्षे २०१४-१५ , २०१५-१६ या वर्षात उथळपेठ येथील आत्माराम वाढई ते भागरती पांदण रस्ता, महादेव चिचघरे ते भाऊजी चिचघरे पांदण रस्ता, भगवान वाढई ते भागरती, मामा तलाव खोलीकरण आदी कामे करण्यात आली. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावातील मजुरांना काम तर कामाच्या माध्यमातून गावाचा विकास साधण्याच्या उद्देशाने दरवर्षी या योजनेअंतर्गत कामे केली जातात. मात्र अधिकारी व रोजगार सेवक यांच्या भ्रष्ट धोरणामुळे या योजनेला गालबोट लागल्याचे चित्र आहे.उथळपेठ येथील झालेल्या कामावर प्रत्यक्ष गेलेल्या मजुरांना कमी मोबदला तर कामावर कधी मजूर गेलेच नाही, अशा मजुरांच्या खात्यात अधिक मजुरी जमा करण्यात आली. कामांवर न आलेल्या मजुरात रोजगार सेवकांचे नातेवाईक असून रोजगार सेवक व ग्रामसेवक यांच्या संगनमताने आर्थिक व्यवहार झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.विशेष म्हणजे रोजगार सेवकांनी वृद्धपकाळात योजनेत लाभार्थी असलेल्या लाभार्थ्यांनाही कामावर आल्याचे दाखवून तर काही मृत व्यक्तींनाही कामावर दाखविले. त्यांच्या खात्यात मजुरी जमा केली, याची माहिती ग्रामस्थांनी इंटरनेच्या साह्याने उघड केली.उथळपेठ येथील रोजगार हमी योजनेच्या देयकाबाबत चौकशी करुन संबंधीतावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सभापती पेंदाम यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे. (वार्ताहर)
उथळपेठ येथे रोजगार हमी योजनेच्या कामात गैरव्यवहार
By admin | Updated: July 21, 2015 01:05 IST